राधिका सांबरेकर / बेळगाव
भारतीय संस्कृतीत साडीला विशेष महत्व आहे. रेश्माच्या रेघांनी आणि भरजरी पदरानी गुंफलेली रेश्मी साडी ही तर साडीची शानच ठरते. रेश्माच्या साडीचा थाट पदरावर असणाऱया कलाकुसरीने अधिकच खुलून येतो. या रेशमी अर्थात शहापूरी सिल्क साडयांची निर्मिती शहापूर-वडगांव भागात होते. पिढयान् पिढया विणले जाणारे रेशीम आणि यातून तयार होणारी शहापूरी सिल्क साडी हे बेळगाव-शहापूरचे वैभव आहे. हातमागापासून सुरु झालेला हा व्यवसाय पॉवरलुम(माग) च्या माध्यमातून परंपरेनुसार सुरु आहे. या व्यवसायात पाचवी पिढी कार्यरत आहे.
शहापूरी सिल्क साडयांच्या निर्मितीचे कारखाने पुर्वी शहापूर भागात होते. पुढे विस्तार वाढत गेला. यामुळे शहापूरी सिल्क साडयांची निर्मिती वडगांव भागात होऊ लागली. मात्र या साडयांचे होलसेल मार्केट शहापूर असल्याने शहापूरी सिल्क साडया म्हणूनच या साडया नावारुपाला आल्या. शहापूर वडगांव भागातील स्थानिक कारागीरांकडूनच रेशमी साडयांची निर्मिती केली जाते. शहापूर सिल्क साडयांच्या निर्मितीचे 8 हून अधिक कारखाने असून या कारखान्यात 300 कारागीर काम करतात. सूत वायडिंग करण्याच्या प्राथमिक कामापासून साडी विणण्यापर्यंतच्या प्रवासाला साधारण 1 दिवसाच कालावधी कालावधी लागतो. त्यानुसार दिवसभरात 300 ते 350 शहापूरी सिल्क साडयांची निर्मिती केली जाते.
कारागीरांची कलाकुसर
प्रत्येक कलाकारांकडून तयार होणारी कलाकृती ही भिन्न असते. शहापूरी सिल्क साडयांची निर्मितीचे देखील हेच वैशिष्टय आहे. सूत कताई पासून पदरावरील नक्षी पर्यंतच्या निर्मितीत संबंधित कारागीरांची कलाकुसर महत्वाची असते. नक्षीकामातील बारकावे, रंगांचा योग्य वापर, कामातील अचूकता महत्वाची ठरते. अनेक वर्षापासून साडी निर्मितीत असणारे कारागीरांकडून तयार होणारी साडी ही वैशिष्टयपुर्णच ठरते.यावरुनच साडीची किंमत ठरते. दिवसाला एका कारागीराला साधारण 600 ते 1000 रुपये पगार पडतो. हा व्यवसाय प्रामुख्याने कारागीरांवरच अवलंबून आहे. मात्र सध्याच्या स्थितीत नवीन पिढी या क्षेत्राकडे वळत नसल्याने कारखाने चालविताना देखील कसरत करावी लागत असल्याचे मत कारखानदारांकडून व्यक्त करण्यात आले.
शहापूर सिल्क ची बाजारपेठ महाराष्ट्र
शहापूर सिल्क साडयांच्या निर्मितीसाठी कच्चा माल आयात केला जातो. रेशीम बेंगळूर येथून तर जर सुरत येथून मागविली जाते. कच्च्या मालावर प्रक्रिया करुन तयार होणारी शहापूरी सिल्कला प्रामुख्याने महाराष्ट्रातून अधिक मागणी आहे. यामुळे हा व्यवसाय प्रामुख्याने महाराष्ट्रातून पुणे, नागपूर, नाशिक तसेच गोवा या बाजरापेठांवरच अवलंबून आहे. केवळ 10 टकके मागणी बेळगाव्-शहापूर या भागातून असते. शहापूरी सिल्क मध्ये नारायणपेठ, जीजामाता, पैठणी, इरकल अशा वैविध्यपुर्ण प्रकारातील साडयांची निर्मिती केली जाते. शहापूरी सिल्क साडयांची किंमत साधारण 6 हजार 11 हजार रुपये पर्यंत आहे. साडीची किंमत प्रामुख्याने निर्मितीसाठी किती कालावधी लागला यावरुन ठरते.
कोरोना काळात मोठी अडचण
कोरोना काळात व्यवसायात खूप अडचणी आल्या. अजूनही अडचणीं आहेत. व्यवसाय टिकवून ठेवण्याबरोबरच या व्यवसायावर अवलंबून असणाऱया कामगारांचे पगार, त्यांच्या कुटुंबाचा खर्च देखील पाहणे ही जबाबदारी होती. यामुळे मोठा कठीण काळ अनुभवला. कच्चा माल होता मात्र तयार माल जाणे कठीण होते. तर काहींना कच्चा माल नसल्याने साडी निर्मितीच थांबवावी लागली.महाराष्ट्रातील परिस्थिती हळुहळु सुधारत असून महाराष्ट्र सुरळीत झाल्याखेरीज व्यवसायाला उभारी मिळणे कठीण आहे. लॉकडाऊन काळात ट्रान्सपोर्ट बंद झाल्याने तयार माल तसाच पडून होता. यामुळे रेशीम साडयांची निर्मितीपासून विक्रेत्यापर्यंत पोहचेपर्यंत कसरतच सुरु आहे.
शहापूरी सिल्क साडयांच्या निर्मितीचा खर्च वाढत गेल्याने सिल्क साडयांची किंमत देखील वाढत गेली. दिवाळी पासून लग्नसराईपर्यंत मागणी अधिक असते. शहापूर सिल्क साडी निर्मितीच्या व्यवसायाला साधारण शतकाची परंपरा लाभली असून 18 रुपये ला शहापूरी सिल्क साडी घेतली असल्याची आठवण एका आजींनी कारखानादारांना सांगितली होती. यावरुन शहापूरी सिल्क साडीची किंमत, दर्जा आणि महत्व परंपरेनुसार अजूनही टिकून आहे.
परंपरागत व्यवसाय पुढे टिकवून ठेवण्यासाठी प्रशासनाच्या मदतीची गरज आहे. कच्च्या मालाच्या आयातीतील अडचणी, मोठया बाजारपेठेचा अभाव, अनुदानापासून वंचित, शहापूरी सिल्क म्हणून केवळ महाराष्ट्रातच नाव, मोठया व्यासपीठाची गरज असून परंपरेनुसार व्यवसाय सुरु असून नवीन पिढी या क्षेत्रात वळण्यासाठी प्रशासनाने या व्यवसायच्या विकासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.