प्रतिनिधी/ बेळगाव
शहापूर येथील पी. के. क्वॉर्टर्स कधी पडतील याची शाश्वती नाही. नुकतेच एका इमारतीची गॅलरी कोसळून तिघे जण जखमी झाले आहेत. गेल्या 25 वर्षांपासून आम्ही ही घरे आमच्या नावावर करावीत तसेच बांधून द्यावीत, अशी मागणी करत आहे. मात्र जिल्हा प्रशासन आणि सरकारने दुर्लक्ष केले असून आम्हाला तातडीने घरे बांधून द्यावीत, अन्यथा कोणतीही दुर्घटना घडली तर त्याला जिल्हा प्रशासन जबाबदार असेल, अशा आशयाचे निवेदन ऑल इंडिया सफाई मजदूर काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे देण्यात आले आहे.
आम्ही शहराची साफसफाई करत असतो. आम्हाला राहण्यासाठी पी. के. क्वॉर्टर्स देण्यात आले आहेत. ते अत्यंत खराब झाले असून कधी कोसळतील याची शाश्वती नाही. नुकतेच एका इमारतीची गॅलरी कोसळून तिघे जखमी झाले आहेत. सुदैवानेच मोठी घटना टळली आहे. तेंव्हा याबाबत गांभीर्य घ्यावे आणि आम्हाला क्वॉर्टर्स बांधून द्यावेत, अशी मागणी या सफाई कर्मचाऱयांनी केली आहे.
दिवसरात्र आम्ही काम करतो. काही कर्मचारी निवृत्त झाले आहेत तर काही जण अजूनही काम करत आहेत. तेंव्हा आम्हाला राहण्यासाठी चांगल्या इमारती बांधून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
शेतकऱयांच्या आंदोलनाला पाठिंबा
शेतकऱयांच्या विरोधात जाचक कायदे काढले आहेत. त्यामुळे शेतकऱयांनी जे आंदोलन पुकारले आहे त्याला आमचा जाहीर पाठिंबा असल्याचे निवेदन देखील यावेळी देण्यात आले आहे. शेतकऱयांविरोधात जे तीन जाचक कायदे अंमलात आणले आहेत ते मागे घेणे महत्त्वाचे आहे. शेतकऱयांना कायदे नको असतील तर सरकारने त्यांचा विरोध घेवून कायदे अंमलात आणण्यामागचे कारण काय? असा प्रश्न देखील करण्यात आला.
शेतकऱयांना आमचा जाहीर पाठिंबा असून सरकारने वेळीच दखल घेऊन शेतकऱयांची ही मागणीही मान्य करावी, असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष काशिराम चव्हाण, जिल्हाध्यक्ष मुरली चव्हाण, सुभाष चव्हाण, निरज बनसकर, संजय भंडारी, चेतन चव्हाण, विवेक घाटकांबळे, अमर बालमिकी, रामेश चव्हाण यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.