प्रतिनिधी / कोल्हापूर
21 नोव्हेंबर 2020 रोजी शहीद झालेले निगवे खालसा येथील जवान संग्राम पाटील यांच्या कुटूंबियांना एक कोटी रूपयांची आर्थिक मदत देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. यातील पन्नास लाख रूपये वर्ग करण्यात आले आहेत. कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी ही आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरील नौशेरा सेक्टर येथे पाक सैन्याबरोबर झालेल्या चकमकीत निगवे खालसा येथील जवान संग्राम शिवाजी पाटील हे शहीद झाले होते. संग्राम यांच्या अंत्यविधी वेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्हयात शहीद झालेल्या संग्राम पाटील यांच्या कुटुंबियांना राज्य शासनामार्फत एक कोटी रूपयांची मदत देण्याची घोषणा केली होती. कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनीही शहीद जवान संग्राम यांच्या निगवे खालसा येथील घरी जावून कुटुंबियांचे सांत्वन करून तीन लाख रूपये मदतीचा धनादेश दिला होता.
मुलांचे शिक्षण आणि भविष्यातील वाटचालीसाठी डी. वाय. पाटील कुटुंबिय पाठीशी राहण्याची तसेच शासकीय मदत मिळवून देण्याचेही आश्वासन दिले हेते. सैनिक कल्याण विभाग, पुणे यांनी शासनास प्रस्ताव सादर केल्यानंतर शहीद जवान संग्राम पाटील यांच्या कुटूंबियांना एक कोटी रूपयांच्या आर्थिक मदतीस मंजुरी दिली आहे. एक कोटी रकमेपैकी 50 लाख रूपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे.
राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या निर्णयानुसार ही आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी ही आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व जिल्हयाचे पालकमंत्री सतेज पाटील यांचेही सहकार्य लाभले.