चूये / प्रतिनिधी
काश्मीर मधील पाकच्या हल्ल्यात शहीद झालेले जवान संग्राम पाटील यांच्या पार्थिवावरती सोमवारी अंत्यसंस्कार होणार असून अंत्यसंस्काराची तयारी प्रशासनाने पूर्ण केलेली आहे. चनिशेटी विद्यालयाच्या समोरील क्रीडांगणवरती लष्करी इतमामध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यामुळे प्रशासनाबरोबर गावातील सर्व ग्रामस्थ तरुण मंडळी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांच्यासह आजी माजी सैनिक अंत्यसंस्काराच्या तयारीसाठी कार्यरत असल्याचे चित्र दिवसभर पाहायला मिळत होते.
शहीद जवान संग्राम पाटील त्यांचे पार्थिव काश्मीरमधून विमानाने पुणे विमानतळावर त्या नंतर तेथून रात्री कोल्हापुरात दाखल होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून प्राप्त झालेली आहे.
क्रीडांगणवरती मध्यभागी अंत्यसंस्काराची जागा निश्चित करून त्या ठिकाणी चबुतरा बांधण्यात आलेला आहे. त्याच्या शेजारी जवान संग्राम पाटील यांचे कुटुंबीय त्यांची व्यवस्था त्याचबरोबर व्हीआयपी मान्यवरांची व्यवस्था प्रशासनातील प्रमुख मान्यवरांची व्यवस्था स्वतंत्ररीत्या करण्यात आलेली आहे.
वीर जवान संग्राम पाटील यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी निगवे गावाबरोबरच करवीर तालुक्यातील विविध गावातील ३० हजारांहून अधिक लोक उपस्थित राहण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने बैठक व्यवस्था मैदाना वरती केलेली आहे मैदानाची संपूर्ण साफसफाई केली आहे.
हजारो हात एकवटले
शहीद संग्राम हा एकट्या पाटील कुटुंबाचा नसून तो निगवे खालसा गावचा सुपुत्र आहे. त्याने देशासाठी दिलेली आहुती आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. हा विचार गावातील प्रत्येक ग्रामस्थांच्या मनामनात उच्चारत आहे. त्यामुळेच गावातील शेकडो ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे संपूर्ण गावाची साफसफाई केलेली आहे. गावच्या मुख्य वेशीपासून प्रवेश करणाऱ्या या मार्गाची डागडुजी साफसफाई केलेली आहे. गावातील सर्वच मार्गावरती शहीद संग्राम पाटील यांचे भावपूर्ण श्रद्धांजलीचे डिजिटल फलक उभे कलेले आहेत. तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मुख्य मार्गावरती भारताचा तिरंगा ध्वज जागोजागी लावलेला आहे.
संपूर्ण गावात एकच तयारी अंत्यसंस्काराची…
वीर जवान संग्राम पाटील ची दुःखद घटना घडल्यानंतर ग्रामस्थांनी तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केलेला आहे. त्यामुळे गावातील सर्व व्यवहार ग्रामस्थांनी बंद ठेवून फक्त अंत्यसंस्काराच्या नियोजनांमध्ये सर्वांनी सहभाग घेतल्याचे चित्र दिवसभर पाहायला मिळत होते.
सरपंच, उपसरपंच त्याचबरोबर सर्व सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी तरुण मंडळाचे कार्यकर्ते आजी माजी सैनिक त्यांनी नेटक्या पद्धतीने अंत्यसंस्काराचे नियोजन केलेले आहे. सर्वांनी गटातटाच्या विचार न करता संग्राम आमचा या भावनेतून अंत्यसंस्काराच्या नियोजनाच्या कामकाजामध्ये सहभाग नोंदवलेला आहे.
अंत्यसंस्काराची जागा आणि त्यासाठी केलेले नियोजन याची पाहणी आणि मार्गदर्शन करण्यासाठी करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे डी वाय एस पी डॉ.प्रशांत अमृतकर तहसीलदार शितल भामरे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल प्रवीण ढोले यांच्यासह प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांनी भेट देऊन अंत्यसंस्काराच्या तयारीची पाहणी केलेली आहे.
मास्कसह उपस्थित रहा
अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहणाऱ्या नागरिकांनी तोंडाला मास्क लावून उपस्थित रहावे त्याच बरोबर वाहतुकीला अडचण येईल अशा ठिकाणी वाहने उभी करू नयेत. एकाच ठिकाणी गर्दी न करता शिस्तबद्धरीत्या उपस्थित राहून प्रशासनाला सहकार्य करावे अशा स्वरूपाच्या सूचना प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी उपस्थित ग्रामस्थ पदाधिकारी यांना केलेल्या आहेत.
पार्किंग व्यवस्था स्वतंत्र..
अंत्यसंस्कारासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येणार आहे. त्यामुळे त्यांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था ग्रामस्थांनी स्वतंत्ररीत्या केलेली आहे. मराठी शाळा गाव लाट या ठिकाणी पार्किंग व्यवस्था केलेली आहे.