देशमुखनगर / वार्ताहर :
सातारा तालुक्यातील वर्णे गावचे भूमिपुत्र
नायब सुभेदार श्रीमंत काळंगे यांचे पार्थिव सकाळी साडेसात वाजता गावात आले. प्रथम पार्थिव अंत्यदर्शनासाठी राहत्या घरीठेवण्यात आले. हे पार्थिव पाहताच कुटुंबियांनी हंबरडा फोडला. हे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते. थोड्याच वेळात अंत्ययात्रा स्मशानभूमीच्या दिशेने मार्गस्थ झाली. रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून नागरिकांनी फुलांची वृष्टी केली आणि श्रीमंत काळंगे यांचे अंत्यदर्शन घेतले. सर्वत्र श्रीमंत काळंगे यांच्या नावाचा जयघोष होत होता. भारत माता की जय!, जबतक सुरज चांद रहेगा, तबतक श्रीमंत तेरा नाम रहेगा, वंदे मातरम, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
श्रीमंत काळंगे हे वयाच्या अठराव्या वर्षीच सैन्यात दाखल झाले होते. 12 मराठा लाइट इंफन्टरीमध्ये त्यांनी सेवा बजावली. त्यांची एकूण सेवा 24 वर्षे झाली होती. दिल्ली, इंफाळ, श्रीनगर, सिक्कीम, बागडोरा याठिकाणी त्यांनी सेवा केली.
काळंगे यांच्या कुटुंबाला मोठी सैनिकी परंपरा आहे. त्यांचे आजोबा स्व. सखाराम हरी काळंगे यांनी ब्रिटिश अमदानीच्या काळात गावात सैन्यभरती आणली होती. आपल्या गावाबरोबर तालुक्यातील अनेक मुलांना सैन्यात भरती केले होते. त्यांचाच वारसा श्रीमंत काळंगे चालवत होते. त्यांचे दोन बंधू सैन्यात आहेत. त्यांच्या तीन चुलत्यानी सेनादलात सेवा केली होती. त्यांचा मुलगाही सैन्यात दाखल झाला आहे. त्यांच्या प्रयत्नाने आज अनेक मुले सैन्यात भरती झाली आहेत.
काळंगे यांचे पार्थिव घेऊन सुभेदार एस.एस.शिखरे व पाच जवान आले होते. त्यांच्या बटालियनमधील सातारा जिल्ह्यातील आजी माजी सैनिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावातील आजी माजी सैनिक तसेच सैनिक पतसंस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
काळंगे यांना प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार सुनील मुनाळे, पोलिस दलाच्यावतीने बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ, कल्याण संघटक सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने ऑनररी कॅप्टन गोरखनाथ जाधव यांच्यावतीने पुष्पचक्र वाहण्यात आली. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव असल्याने कसोशीने सामाजिक अंतर पाळण्याचा प्रयत्न केला. अगदी मोजक्या लोकांनाच स्मशानभूमीत प्रवेश देण्यात आला होता. काळंगे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ, भावजया असा परिवार आहे.