पथसंचलन कार्यक्रमात गृहमंत्र्यांचे आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
नागरिकांची मान, प्राण व मालमत्तेचे संरक्षण करण्याची जबाबदारी पोलीस दलावर आहे. अत्याधुनिक उपकरणांचा वापर करत पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था परिस्थितीला सुरुंग लावणाऱया समाजकंटकांना अद्दल घडवावी, असे आवाहन गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी केले.
राज्य राखीव दलाच्या प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पोलिसांच्या पथसंचलन कार्यक्रमात भाग घेऊन त्यांनी वरील आवाहन केले आहे. एपीएमसी रोडवरील पोलीस परेड मैदानावर हा कार्यक्रम झाला. गृहमंत्री पुढे म्हणाले, सीमेवर आपल्या जीवाची परवा न करता सैनिक देशरक्षणासाठी झुंज देत आहेत. तर देशांतर्गत परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस दलाचे काम सुरू आहे.
देशाच्या सीमेवर सैनिकांना शत्रू थेट दिसतात. देशात असे होत नाही. भ्रष्ट, समाजघातक शक्तींचा शोध घेऊन त्यांना कायद्याचा हिसका दाखवावा लागतो. बॉम्ब स्फोट असो, सायबर क्राईम असो, भ्रष्टाचाराची प्रकरणे असोत मोठय़ा हिमतीने पोलीस अधिकारी अशा प्रकरणांचा तपास करतात. गेल्या दहा वर्षांत पोलिसांना उत्तम सुविधा दिल्या जात आहेत. एखाद्या आयटीबीटी कंपनीप्रमाणे वेतन दिले जात आहे. 40 टक्के पोलीस कुटुंबीयांना दोन बेडरूमची घरे देण्यात आली आहेत. त्यांना वेगवेगळय़ा सुविधा दिल्या जात असल्याचेही गृहमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी गेले आठ महिने प्रशिक्षण पूर्ण केलेल्या व वेगवेगळय़ा स्पर्धेत भाग घेऊन बक्षीस घेतलेल्या शरत एस. व्ही., निंगाप्पा मनगावी, श्रीधर कोरटी, विशाल कत्ती, चंदन एम. सी., राऊताप्पा कोलकार आदींना गृहमंत्र्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी आमदार अनिल बेनके, राज्य राखीव दलाचे एडीजीपी अलोककुमार, बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक सतीशकुमार, पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, राज्य राखीव दलाचे प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य रमेश बोरगावे, दुसऱया बटालियनचे कमांडंट हमजाहुसेन आदी उपस्थित होते.
पदवीधरांची संख्या अधिक
बुधवारी पथसंचलनात भाग घेतलेल्या 171 राखीव दलाच्या पोलिसांपैकी पदवीधरांची संख्या अधिक आहे. 10 जणांनी एसएसएलसी, 34 जणांनी पीयुसी, 85 जणांनी पदवी व 18 जणांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असून 4 जणांनी डिप्लोमा व 17 जणांनी आयटीआयचे शिक्षण पूर्ण केले आहे. पथसंचलनानंतर कराटे प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.