दहशतवाद आणि दहशतवादी हे मुद्दे गेल्या पंधरवडय़ापासून कर्नाटकात ठळक चर्चेत आहेत. सुधारित नागरिकत्व कायद्याच्याविरुद्ध व समर्थनार्थ मोर्चे, प्रतिमोर्चे आयोजित करण्यात येत आहेत. याच संधीचा फायदा घेत हिंदू संघटनेच्या नेत्यांना लक्ष्य करण्याचा कट रचण्यात आला आहे.
दहशतवाद आणि दहशतवादी हे मुद्दे गेल्या पंधरवडय़ापासून कर्नाटकात ठळक चर्चेत आहेत. सोमवारी 20 जानेवारी रोजी मंगळूर विमानतळावर बॉम्ब ठेवण्यात आला होता. लॅपटॉप बॅगमध्ये तब्बल 10 किलो स्फोटके भरून विमानतळावर ठेवण्यात आली होती. स्फोटक तज्ञांनी त्याच दिवशी सायंकाळी एका मैदानावर खड्डा खणून त्या खड्डय़ात जिवंत बॉम्बचा स्फोट घडवून आणला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. बॉम्ब कोणी ठेवला, या विषयावर समाजमाध्यमावर भरपूर कवित्व सुरू होते. यामागे कोणते दहशतवादी वा कोणती दहशतवादी संघटना सक्रिय आहे का, याचा तपास सुरू असतानाच बुधवारी सकाळी उडुपी येथील आदित्य राव (वय 40) हा इसम स्वतःहून बेंगळूर येथील राज्य पोलीस महासंचालकांच्या कार्यालयात हजर झाला. मंगळूर विमानतळावर आपणच बॉम्ब ठेवल्याची कबुली त्याने दिली आहे. कर्नाटकासह दक्षिणेतील राज्यात दहशत माजविण्यासाठी जिहादी संघटना कार्यरत असतानाच आदित्य राव या माथेफिरूने केलेल्या कृत्याने संपूर्ण राज्य हादरले आहे. त्याला अनेक कारणे आहेत. अभियांत्रिकी व एमबीएचे शिक्षण घेतलेल्या आदित्य रावला नोकरी मिळाली नाही. मंगळूर विमानतळावर सुरक्षा रक्षकाची नोकरी मिळविण्यासाठी तो गेला होता. त्यावेळी त्याच्या पदरी निराशा आली. त्यानंतर सातत्याने विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचे सांगत तो पोलीस कंट्रोल रूमला फोन करायचा. यापूर्वी त्याला अटकही झाली आहे. अभियांत्रिकी व एमबीए शिक्षण पूर्ण करणाऱया आदित्य रावने गेल्या तेरा वर्षात अठरा नोकऱया बदलल्याचे समोर आले आहे. बॉम्ब तयार करताना तो मंगळूरमधील एका हॉटेलमध्ये काम करत होता. ऑनलाईन स्फोटके मागवून युटय़ूबमधील माहितीच्या आधारे आपण बॉम्ब बनविल्याची कबुली या माथेफिरूने दिली आहे. दहा किलो स्फोटके वापरून त्याने बॉम्ब बनविला खरा, मात्र तो कार्यान्वित करण्यात त्याला अपयश आले होते. त्यामुळेच मोठा अनर्थ टळला. आता त्याला मनोरुग्ण ठरविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. याच मुद्दय़ावरून काँग्रेस, निजद व भाजप नेत्यांमध्ये जोरदार कलगीतुरा सुरू आहे.
स्फोटक तज्ञांनी दहा किलो जिवंत बॉम्बचा स्फोट घडविल्यानंतर माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी हा बॉम्ब म्हणजे फटाक्मयांचा बॉम्ब आहे, असे सांगत मंगळूर पोलिसांवरच संशय व्यक्त केला होता. पोलिसांनीच केलेला हा बनाव आहे, इथपर्यंत त्यांनी आरोप केले. एकीकडे या बॉम्बमागे जिहादी संघटनांचा हात असल्याची चर्चा सुरू असतानाच कुमारस्वामी यांनी हा आरोप केला आहे. त्यातच आदित्य रावने बेंगळूर येथील राज्य पोलीस महासंचालकांच्या कार्यालयात शरणागती पत्करल्याने चर्चेला उधाण आले आहे. सुरुवातीपासूनच पोलिसांना आदित्य राववर संशय होता. त्याचे मोबाईल ट्रप करण्यात येत होते. तरीही बॉम्ब ठेवणारा युवक बेंगळूरला कसा पोहोचतो, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सध्या मंगळूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.
या घटनेवरच्या चर्चेचा धुरळा उडत असतानाच आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कर्नाटकासह दक्षिणेतील राज्यात घातपात घडविण्यासाठी तामिळनाडूतील अल उम्मा ही संघटना कार्यरत असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. तामिळनाडूतील क्मयू ब्रँच पोलिसांनी बेंगळूर येथील तिघा जणांना अटक केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीवरून देशभरात 18 जणांची धरपकड करण्यात आली आहे. दक्षिणेतील राज्यात इसिस सक्रिय असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. दिल्ली, उत्तर प्रदेशसह देशभरात अटक करण्यात आलेल्या अठरा जणांची सध्या चौकशी सुरू आहे. तामिळनाडूचा ख्वाजा मोईनुद्दिनकडे इसिसची सूत्रे आहेत. एकीकडे तामिळनाडू पोलीस, एनआयए व कर्नाटकातील अंतर्गत सुरक्षा विभागातील अधिकाऱयांनी या संघटनांची पाळेमुळे खणण्याचे काम हाती घेतले असतानाच 17 जानेवारी रोजी एसडीपीआयच्या सहा कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. खासदार तेजस्वी सूर्या, चक्रवर्ती सुलीबेले या भाजपप्रणीत हिंदू संघटनांच्या नेत्यांच्या हत्येचा कट उघडकीस आला आहे. 22 डिसेंबर रोजी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ बेंगळूर येथे हिंदू संघटनांचा मेळावा झाला. याच मेळाव्यात दोन्ही नेत्यांची हत्या करण्याचा कट होता. मात्र, तो प्रत्यक्षात उतरवता न आल्याने त्यांनी मेळाव्याहून परतणाऱया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला केला. त्यामुळे एसडीपीआय व पीएफआय या संघटनांवर बंदी घालण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. गेल्या आठवडय़ात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतही यासंबंधी चर्चा झाली आहे. लवकरच केंद्र सरकारकडे शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सुधारित नागरिकत्व कायद्याच्याविरुद्ध व समर्थनार्थ मोर्चे, प्रतिमोर्चे आयोजित करण्यात येत आहेत. याच संधीचा फायदा घेत हिंदू संघटनेच्या नेत्यांना लक्ष्य करण्याचा कट रचण्यात आला आहे. 19 डिसेंबर रोजी मंगळूर येथे कायद्याच्या विरुद्ध मुस्लीम संघटनांचा मोर्चा झाला. दगडफेक, जाळपोळीनंतर पोलिसांच्या गोळीबारात दोघा जणांचा मृत्यू झाला. या कायद्याविरुद्ध व समर्थनार्थ सुरू असलेल्या आंदोलनाआड आपला हेतू साध्य करण्यासाठी या संघटना टपून बसल्या आहेत. मंगळूर विमानतळावर बॉम्ब सापडला त्यावेळी गोळीबाराचा बदला घेण्यासाठी एखाद्या जिहादी संघटनेने बॉम्ब ठेवल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र, यावेळी आदित्य राव स्वतःहून पोलीस अधिकाऱयांसमोर शरण आला. आपणच बॉम्ब ठेवल्याची त्याने कबुली दिली. त्यानंतर बऱयाच गोष्टींचा उलगडा झाला. कदाचित त्याचा उद्देशही तसाच असावा. वातावरण तापले आहे, कोणीही आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अशी कृत्ये केली तरी ती खपून जातील, अशा भ्रमात या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे समाजजीवन ढवळून निघाले आहे.