प्रतिनिधी / फातर्पा
फातर्पा येथील श्री शांतादुर्गा भूमिपुरुष सप्तकोटिश्वर म्हणजे शांतादुर्गा फातर्पेकरीण संस्थानचा वार्षिक तोपशोत्सव-गुलालोत्सव आज सोमवार 21 रोजी साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवास मोठय़ा संख्येने भाविक लोटून सारा परिसर गुलालाच्या रंगात न्हावून निघत असतो. यानिमित्ताने सकाळी विविध धार्मिक विधी होतील. सायंकाळी 4 वा. ढोलताशांच्या गजरात रंगीबेरंगी फुलांनी, खणांनी सजविलेल्या पाच ‘तोपशा’ नाचवत श्रींच्या पालखी मिरवणुकीस सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी पालखी मंदिरात सजवून श्रींची मूर्ती त्यात विराजमान करण्यात येईल. देवीला गुलाल अर्पण केल्यावर भाविक एकमेकांना गुलाल लावण्यास सुरुवात करतील.
पालखी पारंपरिक वाटेने निघून नंतर ‘पान्नात’ या पारंपरिक जागी पोहोचेल. तिथे रचून ठेवण्यात आलेल्या गवताला (होळीला) आग लावण्यात येईल व भाविक नाचत त्या होळीवरून उडय़ा मारून आणि होळीची विभूती कपाळाला लावून पुढे जातील. पालखीलाही होळीवरून नेण्यात येईल. त्यानंतर पालखी मिरवणुकीकडून भाविकांना देवीचे दर्शन देण्यासाठी थांबा घेतला जाईल. यावेळी ओटी भरण्यात तसेच कुंकू अर्पण करण्यात महिला सहभागी होत असतात. त्यानंतर पालखी पुन्हा मंदिरात आणली जाईल आणि आरत्या, प्रसाद होऊन उत्सवाची सांगता होईल.
‘तोपशा भोवर’ उत्साहात
दरम्यान, गावातील शिमगोत्सव झाल्यावर पौर्णिमेच्या दिवशी संस्थानचा गडय़ोत्सव झाला. त्याचदिवशी सायंकाळी ‘कंज्या भोवर’ झाली, तर दुसऱया दिवशी सकाळी श्री सप्तकोटिश्वरासमोर ‘म्हातन’चा विधी झाला. तिसऱया दिवशी ‘जिन्या भोवर’ व इतर धार्मिक कार्ये झाली. रविवारी सकाळी दिवजोत्सव, तर रात्री ‘तोपशा भोवर’ झाली. यावेळी श्री शांतादुर्गा फातर्पेकरीणच्या ‘तोपशा’ पारंपरिक मार्गावरून मिरवणुकीने श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण संस्थानच्या सभामंडपात आणून रांगेत उभ्या करून ठेवल्या जातात. यावेळी त्यांची ओवाळणी केली जाते. त्यानंतर ठरावीक जागांना भेट दिल्यावर श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण मंदिराकडे येऊन त्या निर्धारित जागी ठेवल्या जातात.
श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण संस्थानच्या जत्रोत्सवाप्रमाणेच हाही वार्षिक उत्सव खूप प्रसिद्ध असून त्याची भाविकांना ओढ लागून राहिलेली असते. संस्थानच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष दिलखुश नाईक देसाई, चिटणीस अजय नाईक देसाई, खजिनदार सुजय देसाई व मुखत्यार देवप्पा नाईक देसाई हे सदर उत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. या उत्सवात भाविकांनी मोठय़ा संख्येने सहभागी होऊन आनंद लुटावा आणि श्रींच्या कृपाशीर्वादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष दिलखुश नाईक देसाई यांच्याकडून करण्यात आले आहे.