गेल्या वषाच्यी पुनःरावृत्तीची भीती : माजी आमदार किरण कांदोळकर कडून पाहणी : बार्देश तालुक्याला पावसाने झोडपले, झाडांची पडझड
वार्ताहर / रेवोडा
गेले दोन दिवस सतत पडत असलेल्या वादळी पावसाने आज शापोरा नदी पात्राच्या पाण्याची पातळी वाढल्याने व इतर गावातील लोकात घबराट निर्माण झाली आहे. बुधवारी सकाळी अचानक पाण्याच्या पातळीत वाढ होत गेली त्यामुळे गेल्या वर्षीची पुनःरावृत्ती पुन्हा होणार नाही ना या भीतीने सामानसुमान उंच स्थानावर ठेवण्यास सुरुवात केली. राण्याचे जुवे, रेवोडा टांक, मानशीवाडा, कामुर्ली आदी भागातील काही घरात पाणी शिरले. शेत व बागायती पाण्याने बुडाल्या. सततचा दोन दिवस पाऊस व पाण्याची भरती त्यामुळे पाण्याची पातळी वाढत गेली ती दुपारपर्यंत नाले, शेत बागायती काही भागातील रस्ते पाण्याखाली गेले तर काही घरात पाणी शिरले. सायंकाळी पाण्याची पातळी उतरत गेली मात्र नागरिकांच्या मनात पाणी पुन्हा वाढेल अशी भीती आहे.
दरम्यान बार्देश तालुक्याला मुसळधार पावसान झोडपले. विविध ठिकाणी झाडांची पडझड झाली. म्हापसा अग्निशामक दलाचे अधकारी वर्ग रस्त्यावर तसेच घरावर पडलेली झाडे कापण्यास मग्न होते. काही ठिकाणी विजेचे खांबही तुटून पडले. गिरी भागात पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली होती. रस्ते पाण्याखाली गेल्याने आजूबाजूला राहणाऱया नागरिकांना ये-जा करताना तसेच वाहतूक हाकत असताना बरेच त्रास झाले. काही जणांच्या दुचाक्यामध्ये पाणी गेल्याने वाहने वाटेवरच अडकून पडलेली पहायला मिळाली.
शापोरा नदीला पूर, कामुर्ली गाव पाण्याखाली
अस्नोडा शिरसई, थिवी, गिरी, सांगोल्डा, वेर्ला काणका, शिवोली परिसर याभागातील शेती पावसाच्या पाण्यामुळे पूर्णपणे पाण्याखाली गेली होती. गेल्या वर्षाचा पूराचा अंदाज घेता बार्देश तालुक्याचे मामलेदार अक्षय पोतेकर यांनी जुवे भागात धाव घेऊन घटनेची व पूरस्थितीची पाहणी केली. कामुर्ली भागात पूर येऊन घरात पाणी घुसल्याने तेथील नागरिक भयभीत झाले होते. गेल्या वर्षाप्रमाणे तिळारी धरणाच्या पाण्याची पातळी वाढल्याने धरणाचे दारे उघडल्याने शापोरा नदीत पाणी घुसले व पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे या पाण्याची झळ भरवणवाडा, भायलाकोड शेती परिसर, आतली परिसर, फेरी धक्का, कातुर्लीवाडा, दरबारवाडा येथील रहिवाशांना पूराचा तडाखा बसला. कामुर्ली फेरी धक्क्याजवळील आनंद खोर्जुवेकर, विनय जोशी तसेच आजूबाजूच्या घरात पाणी घुसले. घटनेची माहिती मिळाल्यावर माजी आमदार किरण कांदोळकर यांनी घटनास्थळी धआव घेऊन होडीच्या सहाय्याने कामुर्ली भागातील परिसराची पाहणी केली. व नागरिकांना घाबरून न जाण्याचा सल्ला दिला.
गेल्या वर्षी ऑगस्ट दि. 6, 7 व 8 रोजी तिळारी धरणातील पाणी अचानक सोडल्याने महाराष्ट्रातील दोडामार्ग तालुक्यातील गावासह शापोरा नदी काठावरील साळ, इब्रामपूर, मेणकुरे, वजरी, पीर्ण, रेवोडा, नादोडा, कोलवाळ व कामुर्ली या गावांना मोठा फटका बसला होता. अनेकांच्या घरात पाणी शिरून घरांची तसेच शेत व बागायतींची मोठय़ा प्रमाणात हानी झाली होती. त्यात राण्याचे जुवे या बेटावरील लोकांना बराच त्रास सहन करावा लागला होता. राण्याचे जुवे बेट संपूर्ण पाण्याने वेढले होते. रात्रीच्यावेळी अचानक पाण्याची पातळी वाढल्याने त्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले होते. त्यामुळे अशी पूरग्रस्त परिस्थिती पुन्हा होईल का अशी भीती त्यांच्यात आहे.
नागरिकांना सूचना देऊनच धरणाचे दरवाजे उघडतील
गेल्यावर्षी लोकांना कोणतीही सूचना न देता अचानक पाणी सोडले त्यामुळे यंदातरी पाणी सोडत असल्यास पूर्व सूचना द्या अशी मागणी नागरिक करीत आहेत. शापोरा नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी वाढल्याने गोवा जलसिंचन खात्याच्या तिळारी प्रकल्प कार्यकारी अभियंते एम.के. प्रसाद यांना विचारले असता त्यांनी सतत पडत असलेला पाऊस व घाटमाथ्यावरील पाण्यात झालेली वाढ व भरती यामुळे पाण्याची पातळी वाढली. धरणाचे पूर्वीचे उघडलेले दरवाजे तसेच आहेत अन्य दरवाडे उघडले नसल्याचे त्यांनी सांगितले मात्र पावसाचा जोर असाच चालू राहिल्यास व धरणात पाण्याची वाढ झाल्यास नागरिकांना सूचना देऊनच दरवाजे उघडले जातील असे सांगितले.
बार्देश तालुक्यात झाडांची पडझड
दरम्यान म्हापसा अग्निशामक दलाचे अधिकारी बॉस्को फेर्राव यांनी दिलेल्या माहितीनुसार वाऱयावादळय़ासह दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे बार्देश तालुक्यात विविध ठिकाणी झाडांची पडझड तसेच काही ठिकाणी घरावर व रस्त्याच्या मधोमध झाडे पडल्याच्या तक्रारी आल्या असल्याचे सांगितले. दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन विविध ठिकाणच्या पडलेली झाडे कापून रस्ता मोकळा केला तसेच घरावर पडलेली झाडेही कापून टाकण्यात आली. मात्र सुदैवाने कुठेही प्राणहानी झाल्याचे नोंद झाले नसल्याचे ते म्हणाले. काही ठिकाणी झाडे विजेच्या खांबावर पडल्याने खांब खाली कोसळून वीज पुरवठा दिवसभर खंडित झाला होता तर काही ठिकाणी रात्री उशीरापर्यंत वीज कर्मचरी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी कामात व्यस्त असल्याचे आढळून आले.
आमदार जोशुआची म्हापसा वीज खात्याला भेट
म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांनी म्हापसा येथील वीज कार्यालयाला भेट देऊन पाहणी केली. वीज कर्मचारी वर्ग खंडित वीज पुरवठा झाल्यास फोन उचलत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी त्यांच्याकडे केल्यावर यामागचे नेमके कारण काय? याची त्यांनी कार्यालयात जाऊन विचारणी केली. तसेच वीज खात्यातील विविध उपकरणांची पाहणी करून खंडित वीज पुरवठय़ाबाबत अभियंत्या वर्गाकडून माहिती जाणून घेतली. म्हापसा मतदारसंघातील नागरिकांना वीज खात्याकडून कोणताही त्रास होणार नाही याची दक्षताही घेण्यास त्यांनी सांगितले. नागरिकांनी पानसाच्या दिवसात सतर्क रहावे असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.