प्रतिनिधी / म्हापसा
शापोरा येथील तीन वाडय़ांना मागील 55 दिवसांपासून नळाला वापरण्यायोग्य पाणी येत नसल्याने गुरुवारी संतप्त रहिवाशांनी म्हापसा येथील साबांखाच्या पाणी विभागाच्या अभियंत्यांना घेराव घालून जाब विचारला.
दरवेळी कार्यालयात भेट दिल्यानंतर दोन दिवसात प्रश्न सोडविला जाईल असे आश्वासन मिळते. परंतु कार्यवाही शून्यच असते. त्यामुळे ग्रामस्थांना आणखीन आक्रमक व्हावे लागेल असेही या स्थानिकांनी म्हटले. स्थानिक सांगतात मागील 55 दिवसांपासून देऊळवाडा, दाभोलवाडा, हुड्डोवाडा या शापोरा- बार्देश येथील सर्व घरांना नळाचे वापरण्यायोग्य पाणी सोडले गेले नव्हते या रागात ग्रामस्थांनी आपला मोर्चा पाठी पुरवण खात्यावर आणला. याप्रश्नी अनेक कॉल, तोंडी सूचना आणि साबांखाच्या कार्यालयात वैयक्तिक भेटी दिल्या. मात्र आजपर्यंत वरील प्रकरणावर कोणतीही कारवाई झालेली नाही असेही ग्रामस्थ म्हणाले. यासंदर्भात त्यांनी साबांखा अधिकाऱयांना विनंती केली की, याप्रकरणात वैयक्तिकरीत्या लक्ष द्यावे आणि तातडीने ही समस्या सोडवावी. अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली. या विभागाचे अभियंते हे कामचुकारपणा करातहेत. वेळोवेळी याविषयी आवाज उठवून सुद्धा ते दुर्लक्ष करतात. शिवाय जलवाहिनीच्या व्हॉल्वशी काही कर्मचारी हे रात्रीच्यावेळी छेडछाड करीत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला. दरम्यान किनारी भागातील सर्व हॉटेल्सना योग्य पाणी पुरवठा होतो मग स्थानिकांच्या नळांना पाणी कसे येत नाही अशी जाब विचारली.