प्रतिनिधी / बेंगळूर
देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी पहिली ते नववीपर्यंतच्या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातही सरकार याच पद्धतीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घ्यावी का? घेतली तर कोणत्या स्वरुपात असावी, लेखी परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना एक-दोन दिवस शाळेत बोलावून मूल्यमापन पद्धतीने उत्तीर्ण करून पुढील वर्गात प्रवेश द्यावा का? याबाबत आज सोमवारच्या बैठकीत निर्णय होणार आहे.
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी होणाऱया बैठकीत शिक्षण खात्याचे ज्येष्ठ अधिकारी, शिक्षणतज्ञ आणि खासगी शाळांच्या संघटना सहभागी होणार आहेत. राज्यातील वाढता कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता पहिली ते नववीपर्यंच्या परीक्षा घ्यावी की नाही याबाबत बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यातील नववीपर्यंतचे वर्ग बंद करण्यात आले आहेत. केवळ दहावीचे वर्ग सुरू आहेत. त्यामुळे पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये परीक्षा होण्याबाबत गेंधळ निर्माण झाला आहे. त्यानुसार परीक्षा होणार की नाही किंवा मूल्यमापन पद्धतीने उत्तीर्ण करण्यात येईल, याचे उत्तर सोमवारी होणाऱया बैठकीनंतर मिळणार आहे.
महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पहिली ते नववीपर्यंच्या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करून पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातही याच पद्धतीचा निर्णय घ्यावा, असा दबाव टाकला जात आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे परीक्षा न घेता पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले होते. पण दहावी आणि बारावीच्या परीक्षा यशस्वीरित्या पार पडल्या होत्या.