नूतन शैक्षणिक वर्षातील मध्यान्ह आहाराचे धान्य वितरण ठप्पच : धान्य वितरण करण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाच्या संकटात शैक्षणिक योजना अपूर्णच राहिल्या आहेत. परिणामी विद्यार्थ्यांच्या आरोग्यात महत्त्वाची भूमिका बजाविणारी मध्यान्ह आहाराची योजना देखील बंदच आहे. 2019-2020 या शैक्षणिक वर्षातील 21 व 37 दिवसांचा मध्यान्ह आहार धान्य स्वरुपात वितरित करण्यात आला. मात्र नूतन शैक्षणिक वर्षातील मध्यान्ह आहाराचे धान्य स्वरुपातील वितरण ठप्पच आहे. यामुळे 2020-2021 या शैक्षणिक वर्षातील इयत्तानिहाय शाळास्तरावर देण्यात येणारा पौष्टिक आहार विद्यार्थ्यांच्या ताटातून गायब झाला आहे. मात्र गरीब गरजू विद्यार्थ्यांचा विचार करून धान्य वितरण करण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे.
बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात 1510 सरकारी शाळा तर अनुदानित 270 शाळांमध्ये मध्यान्ह आहाराचे वितरण केले जाते. गतवर्षी साधारण जिल्हय़ातून 2 लाख 64 हजार 242 विद्यार्थी दुपारच्या जेवणाचा लाभ घेत होते. विद्यार्थ्यांना पौष्टिक आहाराचे वितरण करण्यात यावे या उद्देशाने वैविध्यपूर्ण आहाराचे वितरण करण्यात येत होते. आठवडय़ातील सोमवारपासून शनिवारपर्यंत वारनिहाय खिचडी भात, वरण भात, आमटी भात, मसाले भात, पुलाव, खीर, शिरा यांचे वितरण करण्यात येत होते. यामुळे शिक्षणाबरोबरच पोषण आहार देखील मिळत होता. मात्र लॉकडाऊन आणि कोरोनाचे संकट यामुळे आहार वितरण ठप्प असून विद्यार्थीनिहाय करण्यात येणाऱया धान्य वितरणाबाबत देखील अस्पष्टता आहे.
शिक्षणाबरोबरच पौष्टिक आहारापासून दूर
कोरोनामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून दूर गेले आहेत. त्यातच विद्यागम प्रणाली बंद झाल्याने गरीब व गरजू मुले शिक्षणापासून दूर गेली आहेत. ऑनलाईन शिक्षण गरीब मुलांपर्यंत पोहोचणे कठीण आहे. त्यातच मध्यान्ह आहाराचे वितरण ठप्प असल्याने मुले पौष्टिक आहारापासून दूर जाणार आहेत.
धान्य वितरण करणे गरजेचे
अनेक गरीब कुटुंबांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांती असून किमान शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून धान्य वितरण करणे गरजेचे आहे. पौष्टिक आहाराअभावी विद्यार्थ्यांची शारीरिक क्षमता कमकुवत होण्याची शक्यता असून यामुळे नूतन शैक्षणिक वर्षातील धान्य वितरणाबाबत शिक्षण विभागाने विचार करणे आवश्यक आहे.
आदेश येताच धान्य वितरण करू : बसवराज मिलानट्टी (जिल्हा मध्यान्ह आहार वितरण प्रमुख)
गतवर्षातील मध्यान्ह आहाराचे धान्य स्वरुपात वितरण करण्यात आले असून नूतन शैक्षणिक वर्षातील मध्यान्ह आहार धान्य रुपात वितरण करण्याबाबत विचार सुरू आहे. त्यानुसार पुढील आदेश येताच इयत्तानिहाय जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यातील धान्य वितरण करण्यात येईल, दसरा सुटी संपल्यानंतर याबाबतचे चित्र स्पष्ट होईल.