मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी /सांखळी
राज्यातील शाळा सुरू करण्यापूर्वी शाळांशी संबंधित सगळय़ांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. शाळेच्या संपर्कात येणाऱया सर्वाना लवकरच दुसरा डोस देण्याची तयारी सरकार करत आहे. राज्यातील 90 टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला असून ती समाधानाची बाब आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.
कोलगेट कंपनीच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून सांखळी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि फोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रास रुग्णवाहिका देण्याचा कार्यक्रम काल मंगळवारी सांखळी आरोग्य केंद्रात झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वरील प्रतिपादन केले.
मुख्यमंत्री म्हणाले की राज्यातील सर्व शिक्षकांचे लसीकरण होणे आवश्यक असून शिक्षकेतर कर्मचाऱयांचेही लसीकरण होणे आवश्यक आहे. या लोकांना दुसरा डोस 84 दिवसांऐवजी 30 दिवसांत देण्यात यावा, अशी मागणी राज्य सरकारतर्फे केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. या सर्वांचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर शाळा सुरु करण्याचा विचार केला जाऊ शकतो, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमात डॉ. उत्तम देसाई यांनी सर्वांचे स्वागत केले. विजय गुहे, रमेश पाटील, प्रशांत कामत, डॉ. जे डीसा, डॉ विकास कवळेकर, जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर, सांखळी पालिका सदस्यांची उपस्थिती होती. मुख्यमंत्र्यांनी कोलगेट कंपनीच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली. शुभदा सावईकर यांनी सूत्रसंचालन केले,