कोरोना स्थितीनुसार राज्यांनी घ्यावा निर्णय : 15 ऑक्टोबरपासून शाळा सुरू होणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाच्या संसर्गातही देशातील शाळा-महाविद्यालये सुरू करण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असून केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून सोमवारी नवी नियमावली जारी करण्यात आली. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार देशातील विविध राज्यांमध्ये 15 ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने शाळा सुरू होणार आहेत. मात्र, शाळा सुरु करण्याचा निर्णय झाला असला तरीही हा निर्णय सक्तीचा नाही. राज्यातील कोरोना परिस्थितीनुसार राज्ये याबाबत निर्णय घेऊ शकतात, अशी माहिती देण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या नव्या नियमावलीनुसार पहिल्यांदा मोठय़ा वर्गाच्या आणि मग हळूहळू लहान वर्गांच्या शाळा सुरु करण्यात येतील. शाळा सुरु करण्याबाबतची अंतिम नियमावली राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी निश्चित करावी असे केंद्र सरकारने सुचवले आहे. तरीही सोशल डिस्टन्सिंग पाळणे आणि शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची आणि आरोग्याची काळजी घेणे ही शाळांची जबाबदारी असणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच मध्यान्ह आहारासंबंधीचा निर्णयही राज्यांची आणि शाळांनी घ्यावा, असे सुचित करण्यात आले आहे.
शिक्षण मंत्रालयाने स्पष्टोक्ती दिल्यानुसार, पालकांची लेखी संमती असेल तरच विद्यार्थी शाळेत येऊ शकतात. तसेच विद्यार्थ्यांना रोज शाळेत हजर राहण्यासाठीही दबाव टाकला जाऊ नये असे सुचित केले आहे. विद्यार्थ्यांनी शाळेत हजर राहण्याऐवजी ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब करावा असे आवाहन करण्यात आले आहे
मार्गदर्शक सूचनांचे पालन आवश्यक
ज्या शाळा सुरु करण्यात येतील त्यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शाळांनी राज्याच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. शाळांमध्ये पोषण आहार तयार करताना तसेच त्याचे वाटप करण्यात येताना पूर्ण खबरदारी घेतली जावी असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच शाळा सुरु झाल्यानंतर किमान 2 ते 3 आठवडे मुलांना गृहपाठ देऊ नये, असे केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी स्पष्ट केले आहे.
आरोग्याची योग्य काळजी घ्या!
शाळांमधील वर्ग सुरू केल्यानंतर मुलांचे मनःस्वास्थ्य योग्य राहिल याची काळजी घेण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. तसेच शाळांनाही स्वच्छता आणि कोविड सुरक्षा नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.