प्रतिनिधी/ बेळगाव
विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागातर्फे दरवर्षी विविध उपक्रम राबविण्यात येतात. विद्यार्थ्यांसाठी दाखलाती आंदोलनाच्या माध्यमातून दाखलपात्र विद्यार्थ्यांचे शाळेत नाव नोंदविले जाते. तरीदेखील शाळाबाहय़ मुलांच्या गणतीमध्ये विद्यार्थी आढळून येतात. 2019-20 या शैक्षणिक वर्षात शाळाबाहय़ गणती प्रक्रियेत 45 विद्यार्थी शाळेच्या प्रवाहात नसल्याचे दिसून आले. कोविड 19 च्या संसर्गामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरूच झालेले नाही. यामुळे शाळाबाहय़ मुलांच्या गणतीमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
कोरोनामुळे शैक्षणिक क्षेत्रावर सर्वाधिक परिणाम झाला आहे. परिणामी दरवर्षीप्रमाणे 6 ते 14 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रवाहात आणताना विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया ऑक्टोबर महिन्यापर्यंत सुरूच होती. मात्र, लॉकडाऊनदरम्यान गावी परतलेल्या तसेच दुसऱया जिल्हय़ात गेलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया पार पडली नसल्याने शाळाबाहय़ मुलांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कोरोनाकाळात घरोघरी भेटी देऊन विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करणेदेखील शक्य नसल्याने गणतीचा आकडा वाढणार आहे.
दाखलाती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शाळाबाहय़ मुलांच्या गणतीला प्रारंभ केला जातो. वाडय़ा-वस्तीच्या ठिकाणी स्थलांतरितांमधून शाळाबाहय़ मुले सापडतात. गतवर्षी 45 शाळाबाहय़ मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यात आले होते. मात्र, यंदा शैक्षणिक प्रवाहात आणणे व टिकवून ठेवणे हे मोठे आव्हान आहे. सदर प्रक्रिया सुरू झाल्यानंतरच याचे चित्र समोर येणार आहे.