शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
शाळा सुरू करण्यास संस्थाचालकांचा विरोध
21 सप्टेंबरपासून कोणतीही शाळा सुरू होणार नाही
केंद्राच्या सूचनेवर संस्थाचालकांसोबत बैठक
प्रतिनिधी / मुंबई
केंद्र सरकारने 21 सप्टेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्ष उघडण्याची मुभा दिली असली, तरी राज्यात शाळांसाठी किमान नोव्हेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. संस्थाचालकांनी शाळा सुरू करण्यास नकार दिल्याने दिवाळीनंतरच याबाबत निर्णय घेतला जाईल, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शनिवारी स्पष्ट केले.
केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे 21 सप्टेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु करता येतील किंवा कसे याबाबत चर्चा करण्यासाठी शिक्षण विभागाने शुक्रवारी संस्थाचालक महामंडळाची बैठक घेतली होती. या बैठकीला वर्षा गायकवाड, शालेय शिक्षण विभागाच्या सचिव वंदना कृष्णा, शिक्षण संचालक दिनकर पाटील, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील, युनिसेफच्या रेशमा अग्रवाल यांच्यासह शिक्षण विभागातील विविध अधिकारी, शिक्षणाधिकारी उपस्थित होते.
केंद्र सरकारने राज्यात 21 सप्टेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा नियमित सुरु करण्याबाबत नुकतेच निर्देश दिले आहेत. त्याबाबत मार्गदर्शक कार्यप्रणालीसुद्धा जाहीर केली आहे. परंतु, राज्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता 21 सप्टेंबरपासून शाळा सुरु करणे योग्य नाही, अशी भूमिका या ऑनलाईन बैठकीत संस्थाचालकांनी मांडली. दिवाळीनंतर याबाबत निर्णय घ्यावा, अशीसुद्धा मागणी यावेळी करण्यात आली. संस्थाचालक महामंडळाच्या मागणीची दखल घेऊन 21 सप्टेंबरपासून कोणतीही शाळा सुरु होणार नसल्याचे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. शाळा सुरू करण्याचा निर्णय दिवाळीनंतर निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
परत गेलेले अनुदान सॅनिटायझर, साहित्यखरेदीसाठी वापरा
मागील वर्षी आलेले वेतनेत्तर अनुदान परत गेले असून हे अनुदान आता सॅनिटायझर, निर्जंतुकीकरण आणि स्वच्छता साहित्य खरेदीसाठी तातडीने द्यावे, अशी मागणी बैठकीमध्ये करण्यात आली. शाळेच्या शुल्काबाबत उच्च न्यायालयाचा निर्णय झाला असून आता राज्य सरकारने तसे लेखी निर्देश देणे गरजेचे आहे, अशी भूमिका या बैठकीत संस्थाचालकांनी मांडली.