तब्बल 10 महिन्यांनंतर नववी-दहावीचे वर्ग नियमित : विद्यार्थ्यांची उपस्थिती
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना आटोक्यात आल्यानंतर घरातून शाळेकडे सुरू झालेला विद्यार्थ्यांचा प्रवास नियमित झाला आहे. यामुळे कोरोनानंतर सावरत चाललेली विद्यार्थ्यांची मने नव्या शिक्षणाच्या दिशेने गतिमान झाली आहेत. तब्बल 10 महिन्यांनंतर नववी व दहावीचे वर्ग नियमित झाले असून यामुळे आता शाळेत दिवसभर विद्यार्थ्यांची उपस्थिती दिसून आली.
तोंडाला मास्क, हातात डबा, पाण्याची बाटली, पाठीवर दप्तर आणि पुढील वाटचालीची स्वप्ने पाहत सुरक्षेबरोबरच शिक्षण या संकल्पनेनुसार विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश केला. यामुळे खऱया अर्थाने शालेय शिक्षणाला बहर आला.
कोरोनामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक वाटचाल पुरती बिघडून गेली. अभ्यासातील सातत्य, शिस्त आणि गांभीर्य यापासून विद्यार्थी दुरावले. मात्र अखेर विलंबाने का होईना टप्प्याटप्प्याने शाळा सुरू होताना नववी-दहावीचे वर्ग पूर्णवेळ घेण्याच्या आदेशानुसार अंमलबजावणी सुरू झाली आहे. सोमवारी अंमलबजावणीचा पहिला दिवस होता. मात्र कोरोनाची नियमावली आणि इयत्तांचे वेळापत्रक याची जुळणी करताना येणाऱया अडचणींमुळे अनेक खासगी व्यवस्थापनाच्या बहुतेक शाळांनी केवळ दहावीचे वर्ग पूर्णवेळ घेतले. त्यामुळे नववीचे वर्ग पूर्णवेळ घेतले नसल्याचे दिसून आले. सरकारी व अनुदानित शाळा मात्र आदेशानुसार पूर्णवेळ भरल्याचे दिसून आले
आता भीती कमी झाली-सुमेधा पाटील (इ. 10 वी )
घरी बसून अभ्यास करणे ही एक प्रकारची सवय लागली होती. ऑनलाईन शिक्षण आणि एक महिन्यापासून सुरू झालेले वर्ग यावर आधारित उजळणी परीक्षा घेण्यात येत असून भीती कमी झाली आहे. यामुळे पूर्णवेळ शाळा सुरू झाल्याने सराव होणार असल्याचे मत सुमेधा पाटील हिने व्यक्त केले.
सुरक्षतेबरोबरच शिक्षण-वेदांत मजूकर (इ. 10 वी )
लॉकडाऊन होताच शाळांना सुटी जाहीर झाली. यामुळे प्रथम घरातून अभ्यास खूप सोपा वाटला. मात्र पुन्हा वाटले हे शक्य नाही. यामुळे पूर्णवेळ शाळा सुरू झाल्याने दहावीच्या वर्षाची वाटचाल सुखकर होणार आहे. शाळेतील वातावरण सुरक्षतेबरोबरच शिक्षण असे आहे.
शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे आत्मविश्वास वाढला-प्रिया हलगेकर (इ. 10 वी )
दहावीचे वर्ष खूप महत्त्वाचे असल्यामुळे टेन्शन होते. मात्र अखेर शाळा सुरू झाल्याने टेन्शन कमी झाले आहे. दहा महिन्यांनंतर पूर्णवेळ शाळेत बसण्याची सवय मोडली आहे. मात्र शाळेतील वातावरण आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे आत्मविश्वास वाढला आहे.
पूर्णवेळ वर्गाचा नक्कीच लाभ होईल-श्रेया बिर्जे (इ. 9 वी)
पूर्णवेळ शाळा हे समजताच खूप आनंद झाला. आता द्वितीय सत्राचे अध्यापन सुरू झाले आहे. दहावीच्या दृष्टिकोनातून नववी महत्त्वाची असल्याने पूर्णवेळ वर्गाचा नक्कीच पुढील वर्षी लाभ होईल.
दिवसभर शाळा सुरू झाल्याने आनंद-वैष्णवी भातकांडे (9 वी)
दिवसभर शाळा सुरू झाल्याने आनंद झाला आहे. प्रथम येताना थोडे टेन्शन आले. मात्र आठ-दहा महिने घरीच राहिल्याने कंटाळा खूप आला होता. यामुळे आता रोजची शाळा, रोजचा अभ्यास यामुळे आमची दिनचर्या सुरळीत होईल.