व्हिडिओ-फोटोच्या माध्यमातून अनेक मुलांचे संदेश पोस्ट : विद्यार्थी सोशल मीडियावर कार्यरत
प्रतिनिधी / बेळगाव
शाळेविना विद्यार्थी कंटाळले असून शाळेत परत जाण्याची तीव्र इच्छा विद्यार्थ्यांमध्ये असल्याचे दिसून येत आहे. यामुळे पुन्हा शाळा सुरू करण्याचा आग्रह धरत शालेय विद्यार्थी सोशल मीडियावर कार्यरत झाले आहेत. व्हिडिओ आणि फोटोच्या माध्यमातून मुलांचे संदेश पोस्ट केले जात आहेत. मोबाईलचा वापर करून विद्यार्थीवर्ग पालक-शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली असे व्हिडिओ बनवत असून शाळेविना जाणवत असणाऱया समस्या आणि आव्हाने याचे वर्णन करत शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारला उद्युक्त केले जात आहे.
दक्षिण कर्नाटक, बळ्ळारी तसेच कलबुर्गी, रायचूर आणि इतर अनेक जिल्हय़ांमध्ये मुलांचे व्हिडिओ तयार करून यांच्या माध्यमातून शिक्षण विभागाला शाळा पुन्हा सुरू करण्याची गरज आणि सर्व अनलॉक असताना शाळा का लॉक याची जाणीव करून दिली जात आहे. व्हॉट्स ऍप ग्रुप तसेच फेसबुकवर सदर व्हिडिओ पोस्ट केले जात आहेत. विशेषतः याची गरज ओळखून हे व्हिडिओ व अन्य सामग्री पोस्ट करण्यासाठी एक समर्पित फेसबुक पृष्ठ उघडण्यावर विचार केला जात आहे.
विद्यार्थ्यांना समस्यांची जाणीव
मागील नऊ महिन्यांपासून शाळा बंद आहेत. टीव्ही, मोबाईल तसेच ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शाळा सुरू आहेत. मात्र, यामुळे येणाऱया अडचणी, विद्यार्थ्यांची मानसिकता याकडे दुर्लक्ष होत आहे. रायचूरमध्ये दहावीत शिकणाऱया विद्यार्थ्याने व्हिडिओच्या माध्यमातून चंदन टीव्हीवर प्रसारित केलेल्या घटकांविषयी अनेक समस्या आहेत. मात्र, त्या सोडविण्यासाठी कोणीही नाही. म्हणून मी शाळा पुन्हा सुरू करावी आणि माझ्या समस्या संपवाव्यात, अशी विनंती करत असल्याचे सांगितले. काही विद्यार्थी घरी बसून कंटाळलो असून शाळेत जाऊन नियमित अभ्यास चालू ठेवण्याची इच्छा व्यक्त करत आहेत.
सत्यता पडताळणीसाठी सर्वेक्षणाची गरज
विद्यार्थी, शिक्षक, पालक यांचे शाळा सुरू करण्याबाबत काय मत आहे, ही सत्यता पडताळून पाहण्यासाठी त्वरित सर्वेक्षण करणे गरजेचे आहे, असे डॉ. श्रीनिवास यांचे मत आहे. शाळा सुरू होण्याबाबत शैक्षणिक प्रणालीतील घटकांचा मतप्रवाह आणि यामधील अडचणी समजून घेऊन सर्वेक्षण करून योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे.