प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोनाच्या तिसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने 15 फेब्रुवारीपर्यंत राज्यातील शाळा बंद ठेवण्याचा घेतला निर्णय विद्यार्थ्यांच्या शिक्षण हक्क आणि शिक्षणावर गदा आणणारा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार असून अधीच दोन वर्षे शाळेपासून दूर राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण प्रगतीवर परिणाम होण्याचा धोका आहे. त्यामुळे कोरोनाच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून शाळा सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने केली आहे.
कृती समितीने या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ई-मेलव्दारे निवेदन पाठविले असून त्यामध्ये ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन शाळा सुरू करण्याची मागणी केली असून 20 जानेवारी पर्यंत निर्णय न झाल्यास कृती समितीसह विद्यार्थी, पालक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशाराही दिला आहे.
निवेदनात कृती समितीने म्हटले आहे ः कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱया लाटेत शाळा बंद राहिल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. लाखो मुलांचे भविष्य आणि पिढय़ा आपण बुद्धीने दिव्यांग करण्याचे काम करीत आहोत. दोन वर्षांची शैक्षणिक पोकळी भरून निघेल का? याचाही विचार होण्याची गरज आहे. जर 50 टक्के क्षमतेने चित्रपटगृहे, मॉल , सार्वजनिक ठिकाणे, शासकीय कार्यालये, बार व इतर कार्यक्रम सुरू करता येतात तर विद्यार्थी संख्येनुसार टप्याटप्याने शाळा का सुरु राहू शकत नाहीत.
शाळा बंद राहिल्यास मुले सर्व ठिकाणी, कार्यक्रमांना, खेळायला जाणारच ना ? मग कोरोनाचे संक्रमण होणार नाही का ? त्याऐवजी शाळेत सर्व प्रतिबंध नियम पाळून, उपाययोजना करून, पटसंख्येचे नियोजन करून किमान 2 – 2 तास दोन टप्यात शाळा सुरु ठेवता येतील. जास्त पटसंख्येच्या शाळेत विद्यार्थी एक दिवस आड 50 टक्के संख्यशाळेत उपस्थित राहिल. यासारख्या उपाययोजना करून शाळा सुरु ठेवणे आवश्यक आहे. कोरोना महामारी ही आता दैनंदिन लढाई आहे. तसेच कोरोना ही न संपणारी प्रक्रिया आहे.
मग सतत मुलांचे शिक्षण बंदच करणार का ? याचा विचार होणे आवश्यक आहे. यापुढे शाळा बंद हा पर्याय न करता वार्षिक अभ्यासक्रम कृतिपुस्तिका तयार करणे अथवा मुलांना अभ्यासक्रम कमी कालावधीत कसा प्राप्त होईल, ऑनलाईन बरोबरच ऑफलाईन विद्यार्थ्यांच्या बरोबर कसे पोहोचता येईल, यावर उपाययोजना शोधल्या पाहिजे व कार्यक्रम तयार करायला हवा, अशा सूचना आणि मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. शाळा बंद आणि बाकी सर्व सुरू, असे निर्णय वारंवार होत असल्यास पालक आणि विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराही दिला आहे.
निवेदनावर अशोक पोवर, रमेश मोरे. भाऊ घोडके, चंद्रकांत सूर्यवंशी, राजू मालेकर, पंपू सूर्वे, महेश जाधव, अजित सासणे, कादर मलबारी, विनोद डुणुंग, लहुजी शिंदे, रणजित, पवार, चंद्रकांत पाटील, फिरोज खान, अंजुम देसाई, राजाराम सुतार, दिनकर कांबळे, सुभाष देसाई आदींच्या स्वाक्षऱया आहेत.