सरकारने स्पष्ट भूमिका घेऊन निर्णय जाहीर करावा
प्रतिनिधी /बेळगाव
शाळा बंद…शाळा सुरू…. पहिले ते सातवीपर्यंत शाळा सुरू…. कॉलेज बंद…. पुन्हा पहिली ते आठवी शाळा सुरू…. असे तळय़ात मळय़ात करत सरकारने पालकांशी पाठशिवणीचा खेळ करुन सरकारने पालकांना संभ्रमात टाकले. कोरोना काळामुळे आधिच प्रचंड हेळसांड झालेल्या शिक्षण क्षेत्राबद्दल पालक चिंताक्रांत असताना पुन्हा वेगवेगळय़ा कारणांमुळे शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याच्या निर्णयाबद्दल कमालीची नाराजी पसरली आहे. दरम्यान शाळा सुरू किंवा बंद याबद्दल सरकारने एकदाच स्पष्ट अशी भूमिका घ्यावी व यानंतरच निर्णय जाहीर करावा, अशी मागणीही होत आहे.
साधारण 4 च्या दरम्यान सरकारने शाळा, महाविद्यालये तीन दिवसांसाठी बंद असे सांगितले. त्यानंतर पुन्हा पहिली ते सातवीचे वर्ग सुरू राहणार असे सांगितले. आठवी ते दहावीचे वर्ग सुरू राहतील असे परत जाहीर केले आणि त्यानंतर पुन्हा पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू राहतील व नववी ते दहावीचे वर्ग बंद राहतील असे जाहीर केले. सतत बदलणारे आदेश आणि त्यामुळे निर्माण झालेला संभ्रम यामुळे गोंधळ अधिकच वाढला. रात्री उशीरापर्यंत माध्यमांकडे पालकांची विचारणा सुरू राहिली.
कोणत्याही कारणास्तव शाळा, महाविद्यालये बंद ठेवायची असतील किंवा सुटी जाहीर करण्याचे असेल तर सरकारने तातडीने योग्य निर्णय घेऊन घोषणा करावी तसेच यामध्ये पुन्हा पुन्हा बदल करू नये तरच पालक व विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होणार नाही, अशा प्रतिक्रियाही नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत होत्या.