प्रतिनिधी/ बेंगळूर
कोरोना महामारीमुळे मागील नऊ महिन्यांपासून बंद असणाऱया शाळा आणि पदवीपूर्व महाविद्यालये सरकारच्या मार्गसूचीनुसार 1 जानेवारी 2021 पासून सुरू होत आहेत. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी दहावी आणि बारावी इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी नियमित शाळा-पदवीपूर्व महाविद्यालये सुरू होणार आहे. तर याच कालावधीत सहावी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेतच ‘विद्यागम’ अंतर्गत शिक्षण देण्यात येणार आहे. ब्रिटनमध्ये फैलाव झालेल्या नव्या स्वरुपाच्या कोरोनाच्या भीतीदरम्यान पालकांना आपल्या मुलांना शाळेला पाठवावे लागत आहे.
शाळा-महाविद्यालये सुरू होत असल्याने गुरुवारी शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी कोणत्याही भीतीविना मुलांना शाळेला पाठविण्याचे आवाहन केले आहे. शाळा व्यवस्थापनाने तसेच स्थानिक प्रशासनाने शाळेतील स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाची व्यवस्था केली आहे. ताप, सर्दी, खोकला असणाऱया विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार नाही. जर शाळेतच विद्यार्थ्यांला आरोग्यविषयक समस्या उद्भवल्यास संबंधित पालकांशी संपर्क साधून त्वरित उपचार किंवा चाचणी करून घेण्याची सूचना देण्यात येईल. मुलांमधील भीती दूर करण्यासाठी शाळा परिसरात त्यांच्या स्वागताची तयारी करण्यात आली आहे. ‘कोरोनाला पळवून लावूया, मुलांना सुरक्षितपणे शिकवूया’ या घोषवाक्याद्वारे सुरू होणारे शैक्षणिक वर्ष मुलांसाठी नवे पर्व ठरणार आहे, असा विश्वास शिक्षणमंत्र्यांनी व्यक्त केला.
वर्ग सुरू करण्यासह विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणप्रणालीही सुरू राहणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेत हजर राहण्याची सक्ती नाही. जे विद्यार्थी शाळेत येऊ शकत नाहीत. त्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्याचा मार्गही खुला आहे. शैक्षणिक कार्यक्रम सुरू करण्यास सर्वत्र उत्तम प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थ्यांमध्येही शाळा सुरू होत असल्याने उत्साह आहे. काही शाळांनी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी तोरण, पताके लावले आहेत. यावरून शाळासुद्धा विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत आहेत, असे त्यांनी सांगितले.
माध्यमिक शाळांमध्ये दहावीचे वर्ग सकाळच्या सत्रात होणार असल्याने आठवी आणि नववीचे वर्ग दुपारी 2 ते सायंकाळी 4.30 या वेळेत तीन तासिकांमध्ये दिवसाआड भरतील. तर सहावी आणि सातवीचे वर्ग सकाळी 10 ते दुपारी 12.30 या कालावधीत दिवसाआड भरणार आहेत. दहावीसाठी बोर्डाची परीक्षा असल्याने रविवार वगळता दररोज वर्ग भरविले जाणार आहेत. वर्गात येण्यापूर्वी विद्यार्थ्यांची थर्मल स्क्रिनिंगही केली जाणार आहे. सामाजिक अंतर राखण्यासाठी एका वर्गखोलीत 15 किंवा त्यापेक्षा कमी विद्यार्थ्यांसाठी आसनव्यवस्था केली आहे. पटसंख्येनुसार कमाल 15 विद्यार्थ्यांचा एक गट याप्रमाणे गटवार पद्धतीने शिक्षण देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना वर्गखोल्यांची कमतरता भासत असेल तर शाळेचे ग्रंथालय, प्रयोगशाळा किंवा आवाराचा वापर केला जाणार आहे.
परीक्षा होणारच
मार्च, एप्रिलमध्ये दहावी, बारावीच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत. मे किंवा जूनमध्ये या परीक्षा घेतल्या जातील. पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना विद्यागम अंतर्गत शिक्षण देण्यात येईल. या आधारावरच परीक्षा घेतल्या जातील. परीक्षेविना विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा कोणताही विचार सरकारचा नाही, असे स्पष्टीकरण शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी दिले आहे.
15 जानेवारीनंतर अकरावी, नववीचे वर्गही नियमित भरणार?
15 जानेवारीनंतर अकरावी आणि नववीचे वर्गही नियमितपणे सुरू करण्यासाठी कोविड सल्लागार समितीतील तज्ञांचा सल्ला घेण्यात येईल. दहावी आणि बारावीप्रमाणेच इतर वर्गही नियमितपणे सुरू करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. त्यामुळे पुढील परिस्थिती पाहून याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, असे प्राथमिक-माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी सांगितले.