उपमुख्यमंत्री अश्वथनारायण यांचे संकेत
प्रतिनिधी/ बेंगळूर
नोव्हेंबरमध्ये टप्प्याटप्प्याने शाळा-महाविद्यालये सुरू करण्यासाठी पावले उचलली जातील. शिक्षणतज्ञांशी सविस्तर चर्चा केल्यानंतरच शाळा-महाविद्यालये सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यात येतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अश्वथनारायण यांनी दिली. बेंगळुरात ते पत्रकारांशी बोलत होते.
अश्वथनारायण पुढे म्हणाले, पहिल्या टप्प्यात पदवी, दुसऱया टप्प्यात आठवी ते बारावी आणि तिसऱया टप्प्यात पहिली ते सातवीपर्यंत शाळा सुरू करण्यासाठी पावले उचलण्यात येणार आहेत. तत्पूर्वी, पालक आणि तज्ञांशी सविस्तर चर्चा करूनच राज्य सरकार पुढील निर्णय घेणार आहे. याचबरोबर केंद्र सरकारच्या मार्गसूचीचे पालन करण्यात येईल. एलकेजी वर्ग सुरू करण्याबाबत आगामी दिवसात निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. 2 नोव्हेंबरपासून खबरदारी घेत शाळा सुरू करण्यात येतील. केंद्राकडून युजीसीने दिलेल्या सल्ल्यानुसार उपाययोजना हाती घेत शाळा सुरू करण्यात येणार आहेत, असेही अश्वथनारायण यांनी सांगितले.