प्रतिनिधी/ बेंगळूर
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून रुग्णसंख्येत मोठी भर पडत आहे. अशा परिस्थितीत शाळा-महाविद्यालये केव्हापासून सुरू होतील, असा प्रश्न पालक आणि विद्यार्थ्यांमधून सातत्याने उपस्थित केला जात आहे. प्राथमिक-माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. सध्या शाळा सुरू करण्याबाबत सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. शिवाय याबाबत आमदार, खासदार व इतर लोकप्रतिनिधींची मते जाणून घेण्यात येतील. शिवाय शिक्षण तज्ञ, शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱयांशी आपण संवाद साधत आहे, असे ते म्हणाले.
ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याबाबत सरकार विचार करीत असल्याचे वृत्त सर्वत्र पसरले असून पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे शिक्षणमंत्री सुरेशकुमार यांनी मंगळवारी प्रतिक्रिया देताना राज्यातील शाळा-महाविद्यालये सुरू करण्याच्या तारखेबाबत कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही. त्यामुळे पालकांनी भीती बाळगण्याची आवश्यकता नाही, असे त्यांनी सांगितले आहे.
बिदर दौऱयावेळी त्यांनी दहावी-बारावी वर्ग सुरू होण्यास जितका विलंब होईल, तितकी बालविवाहाची प्रकरणे वाढतील. अशी प्रकरणे पिरियापट्टण तालुक्यात अधिक आढळून आली आहेत. त्यामुळे शाळा सुरू करण्याबाबत आमदारांची मते जाणून घेण्यात येत आहेत, असे ते म्हणाले.