औक्षण, फुलांचा वर्षाव करुन मुलांचे स्वागत : शिक्षकांनी भरवली मिठाई,अवघा शाळा परिसर आनंदमय
प्रतिनिधी /पणजी
मंगलमय वातावरणात, आनंदी मुद्रेत राज्यातील पहिली ते बारावी इयत्तेपर्यंतच्या सर्व शाळा सुमारे दोन वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सोमवारपासून नियमित सुरु होऊन त्या गजबजल्या आणि तेथे घंटी वाजून किलबिलाट देखील झाला. गेले दोन वर्ष मुलांविना सुन्या झालेल्या शाळा पुन्हा मुलांमुळे बहरल्याचे दिसून आले. बहुतेक शाळांमध्ये मुलांचे वेगवेगळ्य़ा प्रकारे स्वागत करण्यात आले. त्यामुळे मुलांचाही आनंद गगनात मावेनासा झाला. शाळेतील मित्र – मैत्रिणी, शिक्षक व इतरांशी संवाद साधता आल्यामुळे एकंदरित सर्वांनाच पुन्हा भेटल्याचा आनंदी अनुभव मिळाला.
काही शाळांमध्ये मुलांचे औक्षण करुन तर काही ठिकाणी पुष्पवर्षाव करुन स्वागत झाले. या अनोख्या स्वागतामुळे मुले देखील भारावून गेली आणि त्यांना आनंदाचे भरते आले. शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी अशा सर्वांच्या सहकार्याने मुलांचे मंगलमय स्वागत करण्यात आले. जी मुले पहिल्या दिवशी शाळेत गेली नाहीत किंवा काही कारणाने पोहोचू शकली नाहीत त्यांना या आनंदी अनुभवास मुकावे लागले. बहुतेक शाळांनी या स्वागताचे व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर प्रसारीत केले आहेत.
राज्यातील कोरोनाचा संसर्ग आता संपुष्टात येत असल्याची चिन्हे असून गेल्या 24 तासात म्हणजे सोमवारी शाळेच्या पहिल्याच दिवशी एकाही बळीची नोंद झाली नसल्याने शाळांसह सर्वांनाच मोठा दिलासा मिळाला आहे. दिवसभरात 49 नवीन रुग्ण सापडले असून 40 रुग्ण बरे झाले आहेत. तर केवळ एका रुग्णाला हॉस्पिटलात भरती करावे लागले आणि एकाला तेथून घरी पाठविण्यात आले. एकूण 48 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे.
पालकांकडून हमीपत्र घेण्याचा प्रकार
शाळेच्या वेळेत जर मुलांबाबत काही घडले तर शाळेचे व्यवस्थापन कोणतीही जबाबदारी घेणार नाही अशा हमीपत्रावर पालकांना सही करण्याची सक्ती काही शाळांमध्ये झाल्याचे समोर आले आहे. त्यासंदर्भात पालकांनी खंत प्रकट केली असून त्याचा निषेधही प्रकट केला आहे.
हमीपत्राबाबत कोणताचा सरकारी निर्देश नाही
अशा प्रकारच्या कोणत्याही हमीपत्रावर सही घेण्याचे निर्देश राज्य सरकारने किंवा शिक्षण खात्याने दिले नव्हते, असा खुलासा सरकारी सूत्रांनी केला आहे. सरकारी शाळेत हा प्रकार घडलेला नसून तो काही खासगी शाळांमध्ये झाल्याचे दिसून आले आहे.
संमतीपत्र घेण्यास शाळांना बंदी घालावी : गोवा राज्य शिवसेनेची मागणी
सोमवार 21 फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याचा निर्णय गोवा शिक्षण खात्याने घेतला आहे आणि तशा आशयाचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. शाळा सुरू करण्याचा निर्णय तज्ञांच्या सल्ल्यानेच झाला असणार. कोणत्याही पालकांनी किंवा पालक-शिक्षक संघटनांनी किंवा राजकीय पक्षांनी विरोध केल्याचे ऐकिवात नाही. काही शाळांनी पालकांना संमतीपत्र लिहून देण्यास सांगितले आहे. या प्रकाराचा शिवसेना निषेध करत असून शिक्षण खात्याने संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
संमती पत्रानुसार पाल्यांची पूर्ण जबाबदारी पालकांची असेल. शिवसेना अशा प्रकारे पालकांकडून संमती पत्र लिहून घेण्यास विरोध करीत असून शिक्षण खात्याने तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. शाळेत पालक येऊन पाल्यासोबत बसून कोविड तत्वे पाळायला लावणे अशक्मय आहे. पाल्यांची शाळेत जबाबदारी पुर्णतः व्यवस्थापनाची आहे. अशा प्रकारच्या संमती पत्रामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शिक्षण खात्याने परीपत्रक काढून अशा प्रकारे संमती पत्र घेण्यास शाळांना बंदी घालावी अशी मागणी गोवा राज्य प्रमुख जितेश कामत यांनी केली आहे. सोबत उपराज्यप्रमुख शैलेंद्र वेलिंगकर आणि तिसवाडी तालुका प्रमुख महेश पेडणेकर उपस्थित होते.