शाळा माध्यमे व व्यवस्थापनांच्या मुख्याध्यापकांमार्फत माहिती
उपलब्ध सोयीसुविधा कोणत्या?
कोणत्या बाबींची पूर्तता आवश्यक
प्रतिनिधी / झाराप:
दरवर्षी शाळा साधारणत: जूनच्या पहिल्या पंधरवडय़ात सुरू होतात. यावर्षी ‘कोविड-19’च्या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष 2020-21 सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे आरोग्य हित व सुरक्षितता याबाबत दक्षता घेण्याच्या दृष्टीने शाळा-शाळांमध्ये उपलब्ध असणाऱया सोयीसुविधा व कोणत्या बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे, याबाबतची माहिती सर्व शाळा माध्यमे व व्यवस्थापनांच्या मुख्याध्यापकांमार्फत मागविण्यात आली आहे. अशीच माहिती विद्यार्थी व पालकांकडूनही मागविण्यात आली आहे.
कोरोना संकटाच्या काळात शाळा कधी सुरू होतील, सुरू झाल्यानंतर शालेय वातावरण कसे राखावे लागेल, याबाबत पालक, शिक्षक, विद्यार्थी आदींबरोबरच सर्वच स्तरावर सध्या चर्चा सुरू आहे. लॉकडाऊननंतर अनलॉक टप्पा सुरू झाल्यानंतर शाळा सुरू करण्याच्या धोरणाबाबतही चर्चा सुरू झाली. याच अनुषंगाने शाळा सुरू करण्याअगोदर शाळांची सद्यस्थिती जाणून घेणे व शाळा कोणत्या योजना राबविण्यास सक्षम आहेत, याबाबतची माहिती गुगल लिंकद्वारे मागविण्यात आली आहे.
माहितीमध्ये विविध बाबींचा समावेश
या माहितीमध्ये पुढील बाबींचा समावेश आहे. शाळांची 30 एप्रिल 2020 ची विद्यार्थी पटसंख्या, सध्या शाळा संस्था विलगीकरणासाठी वापरण्यात येत आहे का?, शाळेत पाणी, नळ, हँडवॉश व्यवस्था, शाळा परिसर स्वच्छतेबाबत माहिती मागविली आहे.
अँड्राईड मोबाईलवर ‘मिटिंग ऍप’ वापरणाऱया शिक्षकांची संख्या, असे मोबाईल वापरणाऱया पालकांची संख्या याबरोबरच शाळेमध्ये दूरदर्शन संच, इंटरनेट सुविधा, डिश टीव्ही नेटवर्क, लोकल केबल नेटवर्क याबाबतची विचारणा करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे त्यांच्या वाडीवार अभ्यासगट तयार होऊ शकतील का?, असल्यास त्याचा किती मुलांना लाभ होईल?, त्याचबरोबर सेवाभावी पद्धतीने डी. एड., बी. एड., पदवीधर, अभियंता, सेवानिवृत्त शिक्षक सेवा देऊ शकतील का?, असेही विचारण्यात आले आहे.
प्रश्नावलीमध्ये कुटुंबाबाबतही माहिती मागविली
प्रश्नावलीमध्ये कुटुंबाबाबतही माहिती मागविली आहे. शाळेच्या संदर्भाने कुटुंबवार मुलांची संख्या तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव याबरोबरच 15 जूनपासून शिक्षक नियमित शाळेत येऊ शकतील का?, मुलांचे पालक मुलांना शाळेत पाठविण्यास इच्छुक आहेत का?, सध्या ‘कोविड-19’करिता किती शिक्षकांना सेवा देण्यात आली आहे?, याबरोबरच महत्वाचे म्हणजे सध्याच्या शाळेच्या पटानुसार 1ƒ1 मी. अंतरात किती मुले शाळेत बसू शकतील? आदी प्रश्नांबरोबरच शाळा व्यवस्थापन समितीची शिफारसही मागविण्यात आली आहे.
धोरण निश्चित करताना
एकूणच जिल्हय़ात शाळा सुरू करण्याच्या धोरणाबाबत वेगवेगळय़ा चर्चा सुरू आहेत. इतरत्र याबाबतची वस्तुस्थिती कशी आहे?. तसेच सध्या वास्तवातील आरोग्य, भौगोलिक व तंत्रज्ञानात्मक सोयी-सुविधांचे वातावरण कसे आहे, याबरोबरच कोविडचा प्रभाव व दूरगामी संभाव्य परिणाम या बाबी केंद्रीभूत ठेवून तसे धोरण निश्चित करावे, असेही बोलले जात आहे.