प्राथमिक-माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांचे स्पष्टीकरण
बेंगळूर
केंद्र सरकारने 1 ऑक्टोबरपासूनअनलॉक 5.0 मार्गसूची जारी केली आहे. त्यामध्ये शाळा-महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारवर सोडून देण्यात आला आहे. दरम्यान, राज्य सरकारनेही शुक्रवारी अनलॉक 5.0 मार्गसूची जारी केली असून शाळा-महाविद्यालये सुरू करण्यास संमती दर्शविली आहे. त्यामुळे 15 ऑक्टोबरपासून शाळा सुरू कराव्यात का?, याबाबत आठवडाभरात निर्णय घेण्यात येईल, असे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी सांगितले आहे.
चामराजनगर जिल्हय़ाच्या हनूर तालुक्यातील तुळसीगेरे येथे शनिवारी भेट दिल्यानंतर ते बोलत होते. केंद्र सरकारच्या मार्गसूचीमध्ये 15 ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने शाळा-महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, शिक्षण खात्याने याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. राज्यात शाळा सुरू करण्यासंबंधी शिक्षण तज्ञ, लोकप्रतिनिधी, पालक, शिक्षण संस्थांशी चर्चा करण्यात येत आहे. त्यांच्याकडून माहिती घेतल्यानंतरच राज्यातील शाळा केव्हा, सुरुवातीला कोणते वर्ग सुरू करावेत यासंबंधी निर्णय घेण्यात येईल. आठवडाभरात निर्णय घेऊन याची घोषणा करण्यात येईल. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले.