तिसऱया लाटेच्या भीतीने संचारबंदीत वाढ होणार : केरळ, कर्नाटकमध्ये बाधितांच्या संख्येत वाढ
प्रतिनिधी /पणजी
दोन डोस घेतल्यानंतरही अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या गेल्या आठवडय़ापासून पुन्हा वाढली आहे. भारतातही पुन्हा बाधितांची संख्या वाढू लागली आहे. कर्नाटकने वाढत्या बाधितांच्या संख्येमुळे नव्याने रात्रीच्यावेळी संचारबंदी लागू केलीय तर केरळमध्ये दिवसाकाठी 22 ते 24 हजार बाधितांची संख्या लक्षात घेता तिसऱया लाटेने प्रवेश केल्याचे बोलले जात असून या पार्श्वभूमीवर गोव्यात 15 ऑगस्टनंतर शाळा सुरू होण्याची शक्यता दूर झाली आहे. त्याचबरोबर संचारबंदीतही पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.
कोरोनाच्या तिसऱया लाटेची सर्वांनीच धास्ती घेतली आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी तिसऱया लाटेला तोंड देण्यासाठी राज्य सरकारची यंत्रणा सज्ज असल्याचे म्हटले होते. गोव्यात कोरोनाची प्रकरणे दिवसेंदिवस कमी होत असल्याने कित्येक शाळा व्यवस्थापनानीच दूरस्थ वर्ग बंद करुन हळूहळू शाळा सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र अद्याप दिवसाकाठी एक दोन जणांचा बळी जातोय. त्यामुळे शाळेत वर्ग सुरू करण्यासाठी व शाळेत जाऊन मुलांची परीक्षा घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी अद्याप होकार दर्शविला नाही. त्याचबरोबर गोव्यात लागू असलेली संचारबंदी जरी सोमवार दि. 9 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वा. संपुष्टात येत असली तरी सरकार कोणतीही जोखीम पत्करणार नाही व संचारबंदीमध्ये पुन्हा एका आठवडय़ाची वाढ केली जाईल. यामुळे 16 ऑगस्टनंतर राज्यातील शाळा सुरू होतील का? याची वाट पाहत असणाऱयांना आता गणेश चतुर्थीनंतरच परिस्थिती पाहून सरकार निर्णय घेईल, असे वाटते.
सध्याच्या परिस्थितीत सरकार कोणतीही जोखीम पत्करु शकत नाही. कारण या अगोदर जोखीम पत्करल्यामुळे राज्यात कोरोनाने हैदोस माजविला. सध्या केरळमध्ये दिवसाकाठी 20 ते 22 हजार नवे रुग्ण निर्माण होत आहेत. केरळमध्ये पूर्णतः संचारबंदी लागू आहे. केरळमध्ये वाढत्या बाधितांमुळे भारतातली तिसरी लाट तिथे सुरू झाली आहे का? याबाबत सरकार अचूक माहिती देऊ शकत नाही. केरळात वाढत्या बाधितांच्या पार्श्वभूमीवर आणि कर्नाटकातही रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने कर्नाटकाने कालपासून नव्याने रात्रीच्यावेळी संचारबंदी लागू केली आहे. सध्या देशातील रुग्णांच्या संख्येत 40 ते 45 हजारांची दररोज भर पडत आहेत व त्यातील निम्मे बाधित हे केरळमध्ये आहेत. या साऱया पार्श्वभूमीवर गोव्यातील शाळांची घंटा वाजण्याची समिप आलेली वेळ पुन्हा एकदा टळली आहे. गोवा सरकारही तातडीने शाळा सुरू करण्यास राजी नाही. मात्र तिसरी लाट गोव्यात येऊ नये यासाठी केरळमधून येणाऱयांची कडक तपासणी सुरू केली आहे. शाळेतील शिक्षक, पालक आणि विद्यार्थीवर्ग देखील कधी एकदा शाळा सुरू होतात याची वाट पाहत राहणाऱयांना आणखी तीन आठवडे वाट पाहावी
लागणार आहे.
उत्सव, शाळा सुरु करण्यासंबंधी अद्याप निर्णय नाही : मुख्यमंत्री
कोरोनाच्या तिसऱया लाटेचा उद्रेक केरळात झाल्याने कर्नाटकानेही आपल्या सीमा बंद केल्या आहेत. गोव्यानेही आता काळजी घ्यायला हवी. त्यासाठी उत्सव, सण, आणि शाळा सुरू करण्यासंबंधी सरकारने अजून कोणताच निर्णय घेतलेला नाही, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, आता एसओपी पाळण्याची सक्त गरज आहे. कोरोनाची तिसरी लाट गोव्यात पोचू नये अशी सर्वांची अपेक्षा असली तर आरोग्य यंत्रणेने सदैव तयारी ठेवणे आवश्यक आहे. राज्य सरकार पूर्ण तयार आहे. जनतेने काळजी घेऊन नियम पाळण्याची गरज आहे. उत्सवांना परवानगी देणे, शाळा सुरु करण्यासंबंधी अजून कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. गोव्याबाहेर कोरोनाची काय परिस्थिती आहे. त्याचा अंदाज घेऊनच योग्य निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी सांगितले.