प्रतिनिधी/ पणजी
येत्या 15 ऑक्टोबरनंतर शाळा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून गोव्यातील मुख्याध्यापक संघटना या प्रकरणी चर्चा करून व बैठक घेऊन सरकारकडे शिफारस करणार आहे. निर्णय मात्र सरकारने घ्यायचा आहे, असे संघटनेच्या सूत्रांनी स्पष्ट केले.
राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय अजून तरी झालेला नाही तरीही हरमल पंचक्रोशी हायस्कूलमध्ये काही प्रमाणात दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. परंतु गोव्यातील इतरत्र कुठेच शाळ सुरू नाहीत. केंद्र सरकारने अनलॉक 0.5 मध्ये 15 ऑक्टोबरनंतर पालक शिक्षकांना विचारात घेऊन शाळा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार शाळा सुरू करण्याची तयारी संघटनेतर्फे केली जात आहे. सरकारने जरी शाळा सुरू केल्या तरी पालक मुलांना शाळेत पाठवतील की नाही? हा प्रश्न आहेच. कोरोनाचा फैलाव वाढताच असल्याने अजून तरी पालकांची मुलांना शाळेत पाठवायची तयारी दिसत नाही.
गोव्यात दररोज कोरोनाचे बळी जात असून प्रतिदिन 500 नवे कोरोनाबाधित सापडत असल्याने सध्या तरी शाळा सुरू करणे मुलांच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे पालकांचे मत आहे. तसेच पालक-शिक्षक संघटनांचा शाळा सुरू करण्यास विरोधच दिसून येत आहे.