मागील तब्बल दीड वर्षांपासून बंद असलेल्या राज्यातील पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय शैक्षणिकदृष्टय़ा अत्यंत महत्त्वपूर्ण मानायला हवा. कोरोनाच्या महामारीने ‘ऑनलाईन’ शिक्षणाच्या तांत्रिकतेत गुरफुटून प्रॅक्टिकल शिक्षणापासून वंचित राहिलेल्या चिमुकल्यांचा अवकाश या माध्यमातून खऱया अर्थाने खुला होणार आहे. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आणि टोकियोपासून ते न्यूयॉर्कपर्यंत प्रत्येक देशाला, प्रांताला व भागाला व्यापून टाकणाऱया कोरोनाच्या साथीने अनेक क्षेत्रांना जबर तडाखा बसला. त्यात शैक्षणिक क्षेत्राचे झालेले नुकसान अपरिमितच म्हणावे लागेल. 2020 मध्ये ऐन परीक्षेच्या तोंडावरच कोरोनाच्या साथीने उग्र रूप धारण केल्याने मार्चपासूनच विद्यार्थ्यांसाठी शाळेचे दरवाजे बंद करावे लागले. त्यानंतर दुसऱया लाटेच्या चक्रव्यूहातही संपूर्ण समाजव्यवस्था सापडल्याने नव्या शैक्षणिक वर्षांतही शाळा सुरू होऊ शकल्या नव्हत्या. किंबहुना, साथीचा प्रभाव ओसरल्याने आधी महाविद्यालये आणि आठवी ते दहावीचे वर्ग व त्यानंतर पाचवीपासूनचे वर्ग सुरू करण्यात आले. तिसऱया लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याने पहिलीपासूनचे वर्ग बंद ठेवण्याचीच भूमिका तज्ञांच्या सल्ल्याने घेण्यात आली होती. राज्य सरकार आणि टास्क फोर्सने नव्याने आढावा घेतल्यानंतर आता अखेर शाळेची घंटा वाजेल. स्वाभाविकच मुलांची कल्पनाशक्ती, प्रयोगशीलता, नवनिर्मितीक्षमता, जिज्ञासा यांना पुन्हा वाव मिळू शकेल. मागच्या दीड वर्षांत ऑनलाईन शिक्षणाचा प्रयोग जरूर झाला. परंतु, त्यात मुलांचे आकलन किती वाढले, त्यांचे वाचन व लेखन कौशल्य किती वाढले, याचा धांडोळा घेतला, तर निराशाच पदरी येईल. मुळात ऑनलाईन शिक्षणाचा बेस कोणता असेल, तर तो म्हणजे स्मार्टफोन होय. परंतु, रोजच्या जगण्याची भ्रांत असलेल्या अनेक पालकांकडे स्मार्टफोन नसल्याने स्वाभाविकपणे या मुलांपर्यंत ही ई-ज्ञानगंगा पोहोचू शकली नाही. ज्या मुलांच्या पालकांकडे असे मोबाईल फोन उपलब्ध आहेत, त्यांच्यापर्यंतही सर्व शैक्षणिक संकल्पना अत्यंत ताकदीने पोहोचल्या, अशातलाही भाग नाही. मुळात वर्गात बसणे आणि ऑनलाईन वर्गात सहभागी होणे, यात जमीन अस्मानचा फरक आहे. वर्गात बसल्यामुळे संबंधित विद्यार्थ्याची एकाग्रता साधली जाते. तसेच शिक्षक वर्गालाही विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष पुरविता येते. यातून या मुलाच्या वाचन, लेखनासह विविध कौशल्यांचा विकास उत्तमरीत्या साधला जातो. तथापि, ऑनलाईन शिक्षणाला मर्यादा असल्याने ही कौशल्ये आत्मसात करण्याच्या आघाडीवर आनंदी आनंदच दिसतो. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे, असे म्हणतात. समाजात राहूनच माणूस प्रगती साधत असतो. लहान मुलेही परस्परांच्या संगतीत राहून शिक्षणाची व आपल्या आयुष्याची बाराखडी गिरविण्यास शिकतात. मात्र, हा सहवासच नसेल, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासामध्ये अडथळे उत्पन्न होतात. मागच्या दीडेक वर्षांत घरातच कोंडून रहावे लागल्याने मुलांच्या भावविश्वावर त्याचा मोठा परिणाम झाल्याचे पहायला मिळते. खेळ, गाणी, अभ्यासातून एकमेकांशी जोडली जाणारी ही चिमुकली ‘ऑनलाईन’द्वारे कनेक्ट झाल्यासारखी वाटली, तरी हे सारे आभासीच होते. उलटपक्षी संवादाअभावी आत्मविश्वास हरवून मुलांमधील बुजरेपणा वाढल्याचे निरीक्षण शिक्षणतज्ञ व्यक्त करतात. उमलत्या वयातच मोबाईल हाती आल्याने कितीतरी मुलांच्या तो आता सवयीचा भाग होऊन बसला आहे. शिक्षणापेक्षा मोबाईलमधील यू टय़ूब, गेम्स यातच मुले बव्हंशी रमतात. मोबाईल हातातून काढून घेतला, की त्यांची चिडचिड होते. स्वाभाविकच मोबाईलची सवय ही समस्याच बनली आहे. त्यात मागच्या वर्षभरात तासन् तास स्मार्टफोनवर ऍक्टिव्ह असल्याने कित्येकांना डोळय़ांच्या विकारांशी सामना करावा लागतो आहे. हे पाहता शाळेची घंटा वाजणे, हे चांगलेच चिन्ह. आता 1 डिसेंबरपासून पहिली आणि दुसरीत असलेले तब्बल 36 लाख 48 हजार विद्यार्थी प्रथमच शाळेत पाऊल टाकतील. त्यामुळे शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट अनुभवायला मिळेल. तरीदेखील शाळांची स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, निर्जंतुकीकरण या स्तरावर कमालीची दक्षता बाळगावी लागेल. अजूनही देशातून वा राज्यातून कोरोनाचे समूळ उच्चाटन झालेले नाही. काही शहरांमध्ये कोरोना रुग्ण वाढत असून, केंद्राकडून अशा राज्यांना खबरदारीच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. हे बघता गाफील राहून चालणार नाही. यूरोप, अमेरिकेत कोरोनाने पुन्हा शिरकाव केला असून, काही देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊनही करावा लागल्याची उदाहरणे आहेत. त्यातून आपणही धडा घ्यायला हवा. मुलांचे शैक्षणिक जीवन सुरळीत होण्यासाठी शाळांना हिरवा कंदील देण्याचा निर्णय समर्थनीय असेलही. परंतु, जानेवारी, फेब्रुवारीत तिसरी लाट येण्याचा काही तज्ञांनी वर्तविलेला अंदाज बघता काळजी घ्यावी लागेल. स्वच्छतेच्या सवयींबाबत पाचवीपासूनच्या विद्यार्थ्यांमध्ये मोठय़ा समस्या असण्याचे कारण नाही. मात्र, पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या वयाचा विचार करता या सवयींना मर्यादा असू शकतात. त्यामुळे महाराष्ट्रासारख्या राज्यामधील एखाद्या शहरात रुग्ण वाढू लागले, तर जोखीम घेऊन चालणार नाही, हेही लक्षात घेतले पाहिजे. ‘विद्यार्थ्यांचे आरोग्य जपणे, ही आपली प्राथमिकता आहे. लहान मुलांसाठी अधिकची खबरदारी घेण्याची आवश्यकता असेल, तर त्याबाबतही तज्ञांशी चर्चा करण्यात येईल,’ असे महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. त्यानुसार शिक्षण विभागाने सजग राहावे. परदेशात मुलांच्या लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली असून, युरोपीय महासंघाने पाच ते 11 वयोगटांतील मुलांकरिता फायझरच्या लसीला मान्यता दिली आहे. भारतीय मुलांनाही हे सुरक्षा कवच मिळाले पाहिजे. त्यासाठी देशातही लवकरात लवकर लहान मुलांच्या लसीकरणास प्रारंभ होईल, अशी अपेक्षा आहे.
Previous Articleपाकिस्तानी राजदुताला ‘26/11’प्रश्नी समन्स
Next Article वाईची स्नेहांजली बनली नेव्हीत अधिकारी
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.