रत्नागिरी / प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या शैक्षणिक वर्षात शाळा कशा प्रकारे सुरु कराव्यात, याविषयी राज्य सरकारच्या शिक्षण विभागात विचारविनीमय सुरू आहे. गतवर्षात अपेक्षेप्रमाणे शालेय कामकाज होऊ शकले नसले तरी येत्या वर्षात संसर्ग टाळून विद्यार्थी संख्येप्रमाणे नव्या वेळापत्रकाचा पर्याय प्रस्तावित करण्यात आला आहे.
कोरोना या साथीच्या प्रसारामुळे आगामी शैक्षणिक वर्षाबाबत अद्याप अनिश्चितता आहे. येत्या जूनमध्ये शाळा सुरु करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. तसे झाल्यास पक्के नियोजन असावे म्हणून शिक्षण खात्यातील अधिकाऱयांनी कच्चे नियोजन करणे सुरु केले आहे. काही शाळांमध्ये पटसंख्या कमी आहे. जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये पटसंख्या 50 पेक्षा कमी आहे. तेथे दोन मुलांमध्ये 1 मीटरचे अंतर ठेवून आणि एकमेकांना स्पर्श होणार नाही, असे उपक्रम घेत अध्ययन, अध्यापन प्रक्रिया सुरु करण्याचा विचार आहे. ज्या शाळांमध्ये पटसंख्या जास्त आहे, तेथे एका बाकावर 2 किंवा 3 विद्यार्थी बसवले जातात. काही शाळांमध्ये वर्ग छोटे आणि विद्यार्थी जास्त आहेत.
शाळा भरवताना स्वच्छता, विद्यार्थ्यांना जंतुनाशक, मुखपट्टी असे निर्देश देण्याची तयारी शिक्षण विभागाने ठेवली आहे. शिक्षण विभागाकडून शाळा भरवण्यासाठी 3 पर्याय विचारात घेण्यात येत आहेत. याशिवाय आणि काही पर्याय सूचवले गेल्यास त्याचाही विचार शिक्षण विभाग करणार आहे. शाळकरी मुलांची ने-आण करणाऱया व्हॅनमधून किती मुलांची वाहतूक करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नेहमी या व्हॅनमध्ये मुले दाटीवाटीने बसवलेली असतात. या बाबत परिवहन विभाग निर्देश देण्याची शक्यता आहे
शाळांसाठी तीन पर्याय:
1) पूर्व प्राथमिकपासून पाचवीपर्यंतचे वर्ग सकाळी 8 ते 11 या वेळात घ्यावेत. तर 6 वी ते 10 वी चे वर्ग दुपारी 1 ते 4 या वेळात भरवावेत.
2) पूर्व प्राथमिक ते पाचवीचे वर्ग सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी तर सहावी ते दहावीचे वर्ग मंगळवार, गुरुवार आणि शनिवार पूर्ण वेळ भरवावेत.
3) पूर्व प्राथमिक ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या पटसंख्येप्रमाणे गट करून आणि ऑनलाईन वर्ग अशा दोन्ही पध्दतीने अध्यापन करणे.