ऑनलाईन टीम / मुंबई :
शाळा सुरू करण्याच्या संदर्भात ठाकरे सरकार, टास्क फोर्स आणि मंत्र्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा समन्वय नसल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पुढे ते म्हणाले, ठाकरे सरकार काहीतरी वेगळे सांगते, टास्क फोर्स विरोध दर्शवते त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शिक्षणमंत्री, मुख्यमंत्री, टास्कफोर्स यांनी एकत्रित बसून निर्णय जाहीर केला पाहिजे. असे झाले तरच पालक आणि विद्यार्थी यांच्यातला संभ्रम, गोंधळ दूर होईल असेही फडणवीस यांनी म्हटले आहे. आज ठाण्यातील कोपरी येथे असलेल्या पुलाची फडणवीस यांनी पाहणी केली त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
कोपरी पुलाचे काम आमचे सरकार आल्यानंतर सुरू झाले. ठाणेकरांची मागणी लक्षात घेऊन हे काम आता पूर्ण होत आहे. याबाबत ज्या काही तक्रारी आल्या होत्या त्या दूर झालेल्या असल्या तरीसुद्धा यातील आणखीन काही त्रुटी असतील तर त्या दूर केल्या जातील व हा पूल ठाणेकरांसाठी भविष्यात निश्चितच लाभदायक ठरेल असे त्यांनी सांगितले. लवकरच या पुलाचे काम पूर्ण होऊन तो वाहतुकीसाठी खुला होईल असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
- शाळा बंदच ! …
महाराष्ट्र सरकारने शाळा सुरू करण्यासंदर्भातला जीआर काढला होता. ज्यानुसार राज्यातील शाळा या 17 ऑगस्टपासून सुरू होणार होत्या. ग्रामीण भागातील पाचवी ते सातवी आणि शहरी भागातील आठवी ते बारावी असे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासंदर्भातल्या मार्गदर्शक सूचनाही सरकारने जारी केल्या होत्या. मात्र 11 तारखेला कॅबिनेटची जी बैठक झाली त्या बैठकीत शाळा सुरू करण्याबाबत चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री आणि टास्क फोर्स यांच्यातही चर्चा झाली. यानंतर आधी काढलेला शाळा सुरू करण्याचा जीआर हा मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे येत्या 17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर पडला आहे. आता अतिंम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार आहेत.