मुक्तीसागर महाराजांचे प्रतिपादन : अकोळ येथे बाहुबली विधान
वार्ताहर/ अकोळ
शाश्वत सुखाची प्राप्ती करून घेण्यासाठी धार्मिक विधानांचे आयोजन करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प. पू. 108 मुक्तीसागर मुनी महाराज यांनी केले. येथील जैन समाजाच्या सांस्कृतिक भवन कार्यालयात जैन समाज, वीर सेवा दलाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री भगवान बाहुबली विधान व पिंछी परिवर्तन सोहळय़ात ते बोलत होते.
महाराज पुढे म्हणाले, आजचा तरुण वर्ग मोठय़ा प्रमाणात मोबाईलच्या आहारी गेल्याने धर्माकडे दुर्लक्ष होऊन जीवनातील स्वास्थ्य कमी करून घेत आहेत. अशा कार्यक्रमांचा काही अंशी बोध घेऊन सर्वांनी आपले जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले. गेल्या चार महिन्यापासून जैन बस्तीत मुनीसागर यांचा वर्षायोग सोहळय़ाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या भगवान बाहुबली विधानाचा असंख्य श्रावक-श्राविकांनी लाभ घेतला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनावश्यक कार्यक्रम टाळून साध्या पद्धतीने हा सोहळा झाला.
विधान कार्यक्रमाच्या माध्यमातून देशावर दहशत माजविणाऱया रोगराईचा नाश व्हावा, अशी प्रार्थना करण्यात आली. सोहळा यशस्वी करण्यासाठी समाजाचे अध्यक्ष सचिन पाटील, वीर सेवा दलाचे अध्यक्ष शाश्वत पाटील, उपाध्यक्ष रजत पाटील, महिला मंडळ, श्रावक-श्राविकांचे सहकार्य लाभले. या समारंभात कोण्णूर (गोकाक) येथील श्रावकांनी मुक्तीसागर महाराजांना विहारासाठी दिलेल्या वाहनाचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.