प्रतिनिधी/ सातारा
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर काळजी म्हणून शासकीय कार्यालयात येणाऱया नागरिकांना दोन डोस ज्यांनी घेतला आहे त्यांनाच प्रवेश देण्यात येईल असे जिल्हाधिकाऱयांनी जाहीर केले होते. त्याची अंमलबजावणी जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु करण्यात आली आहे. इतर कार्यालयात अद्यापही अंमलबजावणी नाही. सर्वसामान्यांचीच अडवणूक केली जात असल्याने शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयात जात आहात दोन्ही डोस घेतलेल्याचे प्रमाणपत्र जवळ बाळगा, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
गेली अठरा महिने कोरोनाने पिच्छा सोडला नाही. गेली दोन महिने सातारा जिह्यातील कोरोना कमी झाला अन् काहीसी मोकळी मिळतेय तोच नव्याने ओमायक्रॉन नावाचा व्हेरिएंट येवू घातला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दोनच दिवसांपूर्वी शासकीय कार्यालयात नागरिकांना यायचे असेल तर दोन डोस घेतलेल्याचे प्रमाणपत्र जवळ असणे बंधनकारक आहे असे आदेश दिले गेले आहेत. त्या आदेशानुसार सातारा जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेच्या इमारतीत त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्याकरता बाहेरुन येणाऱया नागरिकांकडे प्रमाणपत्र आहे का?, असल्यास त्याची नेंद करुन आतमध्ये प्रवेश दिला जात आहे. मात्र, यावर शिवसेनेच्यावतीने उपशहरप्रमुख गणेश अहिवळे यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
जेव्हा व्हॅक्सीन देण्यास प्रारंभ केला तेव्हा सुरुवातीला आरोग्य कर्मचारी झाल्यानंतर शासकीय कर्मचाऱयांना प्राधान्य देण्यात आले होते. तरीही त्यामध्ये काही कर्मचाऱयांनी दोन्ही डोस घेतले नसल्याची बाब समोर येत आहे. तेव्हा अशा कर्मचाऱयांकडून शासकीय कार्यालयात जाताना प्रमाणपत्र न देताच शिरकाव केला जात आहे. त्यांच्याकडूनही लस घेतली आहे याचे प्रमाणपत्र घेवूनच त्यांना प्रवेश द्यावा. सर्वसामान्यांना जशी वागणूक दिली जाते तशीच सरकारी कर्मचाऱयांना देण्यात यावी, तरच प्रशासनावरचा विश्वास वाढेल, अशी विनंती करत शिवसेनेचे उपशहरप्रमुख गणेश अहिवळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.