प्रतिनिधी / इचलकरंजी
येथील वारणा योजना स्थगित अथवा रद्द होण्याची शक्यता नुकत्याच जाहिर झालेल्या शासननिर्णयातील नवीन सुधारणेमुळे मंदावली आहे. या सुधारणेनुसार पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील अत्यावश्यक कामांना पुर्वीच्या शासननिर्णयातील निर्बंधातून वगळण्यात आले आहे. यामुळे आता तरी इचलकरंजी नगरपालिका मिळालेल्या संधीचे सोने करणार का ? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
इचलकरंजीच्या पाणीप्रश्नासाठी वरदायीनी असणारी वारणा योजना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या वित्त विभागाच्या ४ मे रोजीच्या शासननिर्णयानुसार रद्द की स्थगित होते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. गेल्या १० वर्षापासून प्रलंबित असणारी ही योजना रद्द झाल्यास याचे दुरगामी परिणाम इचलकरंजी शहराच्या पाणीप्रश्नावर होणार होते. टोकाच्या इर्षेनंतर अजूनही जिवंत राहिलेली व कधीतरी वारणेचे शुध्द व मुबलक पाणी शहराला मिळेल या आशेवर राहिलेल्या नागरिकांचा यामुळे पुरता भ्रमनिरास झाला होता. पण शासनाने नुकतीच पुर्वीच्या परिपत्रकामध्ये एक सुधारणा सुचवत नवीन शुध्दीपत्रक जारी केले आहे.
या शुध्दीपत्रकानुसार पुर्वीच्या शासननिर्णयातील निर्बंध हे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागासाठी उन्हाळ्यातील टंचाई अंतर्गत अत्यावश्यक स्वरूपाच्या व मुलभूत गरजांच्या कामांना लागू राहणार नाहीत असे जाहिर केले आहे. यामुळे मरणासन्न अवस्थेत असलेल्या वारणा योजनेची धुगधुगी कायम राहण्यास मदत मिळाली आहे. पण त्याचबरोबर या शुध्दीपत्रकानुसार ग्रमविकास अथवा नगरविकास विभागाने ३१ मार्च २०२० पूर्वी वितरीत करण्यात आलेल्या शिल्लक निधीच्या मर्यादेतच खर्च सिमित ठेवावा, तसेच याचा वित्तीय भार २०२०-२१ या वर्षासाठी निर्माण केला जाणार नाही या अटीच्या अधीन राहून काम हातात घेण्याचे बंधन घातले आहे. यामुळे आता खरी कसोटी पालिका प्रशासनाची असून या सर्व अटींच्या आधीन राहत १० वर्षापासून प्रलंबित वारणा योजनेला चालना देण्याचे आव्हान त्याच्यासमोर आहे. हे आव्हान पुर्ण होणार की पुन्हा ये रे माझ्या मागल्या असा प्रकार होणार हे काही काळातच समजणार आहे.