ऑनलाईन टीम / म़ुंबई :
शासनाच्या विविध विभागामार्फत (अन्न आणि नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग वगळता) करण्यात येणाऱया मालवाहतूकीपैकी 25 टक्के मालवाहतूक एसटीच्या महाकार्गो मालवाहतूकीद्वारे करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. त्याबाबतचा शासन निर्णय गृह विभागाद्वारे जारी करत सर्व विभागांना निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ऍड. अनिल परब यांच्या सातत्यपुर्ण प्रयत्नांना यश आले असून, अर्थिकदृष्टया संकटात सापडलेल्या एसटी महामंडळाला महसूलाचा शाश्वत स्त्रोत सुरू आहे. एसटी महामंडळाने प्रसिद्धीपत्रकाद्वारेे यासंदर्भात माहिती दिली आहे.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य शासनाने लॉकडाऊन घोषित केला होता. या निर्णयामुळे 23 मार्च 2020 पासून प्रवासी वाहतुक बंद होती. परिणामी प्रवासी संख्या घटल्याने एसटीच्या उत्पन्नावर परिणाम झाला होता. तसेच कडक निर्बंधामुळे सर्व सामान्यांना लागणाऱ्या जीवनाश्यक वस्तूंचा तसेच इतर मालांच्या वाहतूकीवर विपरित परिणाम झाला होता. अर्थिकदृष्टया अडचणित सापडलेल्या महामंडळाला बाहेर काढण्यासाठी एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांच्या अध्यक्षतेखालील संचालक मंडळाच्या बैठकीत महामंडळाने उत्पन्नाच्या विविध स्त्रोतांचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये व्यावसायिक तत्वावर माल वाहतुक करणे, डिझेल-पेट्रोल पंप सुरु करणे, टायर पुनस्त:रण संयत्र सुरु करणे तसेच महामंडळाच्या मोकळया जागेचा व्यापारी तत्वावर उपयोग करणे या सारख्या उपाययोजनांचा प्राधान्याने समावेश होता. यानुसार महामंडळाने व्यावसायिक तत्वावर मालवाहतुक सेवेत पदार्पण केले. महामंडळाने 21 मे 2020 पासून राज्यभरात अतिशय माफक दरात मालवाहतूक सेवा सुरु केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.