अखिल भारत शाकाहार महासंघातर्फे आंदोलनाद्वारे मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
शासनाने अंगणवाडीपासून आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अंडी देण्याचा निर्णय घेतला आहे. याविरोधात अखिल भारत शाकाहार महासंघाने आंदोलन छेडले आणि शासनाने अंडी देण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी जोरदार मागणी केली.
शाळांमधून ब्राह्मण, लिंगायत, जैन अशा विविध समाजातील मुले शिक्षण घेत असतात. यामध्ये बरीच मुले अंडी सेवन करत नाहीत. त्यामुळे त्यांच्यामध्ये भेदभाव निर्माण होतो. याकरिता शासनाने एकरूप आहार द्यावा, शासन सर्व विद्यार्थ्यांना समवस्त्र, पाठय़पुस्तके देते. मात्र, आहारात भेदभाव का केला जातो? असा प्रश्नदेखील आंदोलनकर्त्यांनी केला.
विद्यार्थ्यांना पोषणासाठी अंडय़ाऐवजी हरभराडाळ, गूळ आणि शेंगा देऊ शकते. मात्र, अंडय़ाची सक्ती का केली जात आहे? हा अंडी देण्याचा निर्णय मागे घेऊन इतर शाकाहारी पौष्टिक आहार द्यावा. याबरोबरच शाळांमध्ये ब्राह्मण, लिंगायत, जैन आणि इतर समाजाचे शिक्षक सेवा बजावतात. अशा शिक्षकांना अंडय़ांना स्पर्श करून विद्यार्थ्यांना वितरित करावी लागतात. त्यामुळे शिक्षकही अडचणीत आले आहेत. त्यामुळे अंडी देण्याचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी अखिल भारत शाकाहार महासंघाने आंदोलनाद्वारे केली.