तरुण भारत संवाद प्रतिनिधी / बार्शी
बार्शी शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना आता पोलीस प्रशासन काही कठोर भूमिका घेणार आहे. त्यामुळे शासनाने कोरोनाच्या बचावासाठी घालून दिलेले नियम जर मोडले तर कोणाचीही गय केली जाणार नाही असा सज्जड दम बार्शी शहर पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी दिला आहे.
यावेळी पोलीस निरीक्षक गिरीगोसावी यांनी केलेल्या आवाहननुसार बार्शीतील सर्व दुकानदार व व्यापारी यांनी कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या अनुषंगाने करावयाच्या उपाय योजना व अंमलबजावणी अनुषंगाने दिनांक 6 जुलैपासून पोलीस प्रशासनाकडून दुकान उघडण्याचे व बंद करण्याचे वेळेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे असे सांगितले. त्याचबरोबर सोशल डिस्टंसिंग न पाळणारे तसेच संसर्ग रोखण्यासाठी उपाय योजना न करणाऱ्या आस्थापनांवर देखील कारवाई करण्यात येणार आहे. मोटर सायकल वर एकापेक्षा अधिक व्यक्ती, तसेच तीनचाकी व चारचाकी मध्ये 1+2 पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करताना आढळून आल्यास त्यावर देखील कारवाई करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे आज सकाळी बार्शी शहरामध्ये विविध ठिकाणी पोलिसांची पथके पाठवून कारवाई करण्यात आली यावेळी मोटर वाहन कायद्याप्रमाणे कारवाई झाली. त्यात ट्रिपल सीट फिरणारे दहा जण, डबल सीट फिरणारे 70 गाड्यांवर कारवाई झाली व इतर विविध नियम मोडलेले चोवीस गाड्यावर अशी 104 वाहचालकवर आज सकाळच्या तीन तासातच कारवाई झाली असून आज एकवीस हजार सहाशे रुपये इतका दंड वसूल केला आहे. 20 वाहने जप्त केली असून 39 नागरिकावर मास्क न वापरल्यामुळे कारवाई केली आहे. कोरोना प्रतिबंधित क्षेत्रातून बाहेर आल्यामुळे तीन नागरिकांवर कडक कारवाई झाली आहे अशी माहिती बार्शी शहर पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांनी ‘दै तरुण भारत संवाद’ शी बोलताना दिली.