सांगरूळ /वार्ताहर
शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत शासनाकडून सरसकट कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात कर्जमाफीचा लाभ देताना मात्र प्रामाणिकपणे नियमित व वेळेवर कर्जाचे हप्ते भरणाऱ्या व संख्येने अधिक असणाऱ्या शेतकऱ्यांना वगळून कर्जाची रक्कम वेळेवर न भरलेल्या हाताच्या बोटावर मोजता येतील एवढयाच थकबाकीदार कर्जदारांनाच याचा फायदा दिला जातो. त्यामुळे शासनाने एकदा सरसकट कर्जमाफीचा नेमका अर्थ काय आहे ? ते स्पष्ट करावे आणि प्रामाणिक शेतकऱ्यांची होणारी दिशाभूल थांबवावी अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत सांगरूळ येथील शेतकऱ्यांनी गावातील पांडुरंग सेवा सोसायटीला कुलूप लावून आपला संताप व्यक्त केला.
सांगरूळ सह पश्चिम भागातील अनेक गावातून शेतकऱ्यांनी एकत्र येत सेवा संस्थांना टाळे ठोकून शासनाच्या कर्जमाफीच्या विरोधातला आपला असंतोष व्यक्त केला. कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही तर सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा ही यावेळी शेतकऱ्यांनी दिला.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा वचननामा जाहीर केला होता. निकालानंतर राज्यात उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीमुळे सरकार स्थापनेला विलंब होत होता. यावेळी सर्वसामान्य शेतकरी वर्गातून राज्यात कोणतेही सरकार स्थापन होऊ दे आणि महापुराच्या तडाख्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीचा हात मिळवून त्याचा सातबारा कोरा करू दे आणि पुढील पिकासाठी कर्जपुरवठा व्हावा अशी अपेक्षा होती. सरकार स्थापन झाल्यानंतर कर्जमाफीचा निर्णय झाला आणि हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच थकबाकीदारांना लाभ झाला. यामुळे शेतकरी वर्गातून संतापाची लाट उसळली असून त्यांनी एकत्र येत आज गावातील सेवा संस्थेला कुलूप लावून संस्था बंद केली
प्रत्यक्षात कर्जमाफी झालेल्या शेतकर्यांची यादी शासनाकडून येते तेव्हा गावातील हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच शेतकऱ्यांचा यात समावेश असतो. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची नावे कर्जमाफीतून वगळलेले असतात. त्यामुळे आम्ही सेवा संस्थेकडून व बँकाकडून घेतलेले पिक कर्ज वेळेवर भरतो हा आमचा गुन्हा झाला का असा संतप्त सवाल शेतकरी वर्गातून केला जात आहे. शब्दांचा खेळ करून शेतकऱ्यांची दिशा भूल करणार असेल तर सरकारला शेतकरी भविष्यात आपली ताकद दाखविल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी या वेळी दिला.
यावेळी सांगरुळ येथील श्री पांडुरंग विकास सेवा सोसायटीचे सभासद व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.