प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोविड 19 प्रतिबंधात्मक उपायांचा भाग म्हणून जिह्यात विविध ठिकाणी दिवस-रात्र कार्यरत शिक्षकांना ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेसाठी कार्यमुक्त करण्याचे महाराष्ट्र शासनाच्या आदेशांनाच केराची टोपली दाखवत प्रशासनाने त्यांना काम देणे सुरुच ठेवल्याने शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. या बाबत एका निवेदनाद्वारे बुधवारी जिल्हाधिकाऱयांचे लक्ष वेधण्यात आले.
शासनाकडून जारी परिपत्रकानुसार कोविड 19 आजार प्रतिबंध डय़ुटीसाठी नेमलेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करा असे आदेश आहेत. मात्र या सूचनांची अंमलबजावणी जिह्याचे शिक्षणाधिकारी, विविध तहसीलदार यांनी अद्याप केली नाही. यासंबंधी दोन परिपत्रके शासनाने जारी केली मात्र परिपत्रक जारी झाल्याच्या दुसऱया दिवशीच नवे आदेश काढून प्रशासनाने शिक्षकांना ‘कोविड डय़ुटी’ लावल्याने शासनाच्या परिपत्रकालाच केराची टोपली दाखवल्याचे म्हटले जात आहे. जिह्यातील शिक्षकांच्या अनेक संघटना या विरोधात एकवटल्या आहेत. विशेष म्हणजे यामध्ये शिक्षण विभागातील अधिकारीही बघ्याची भूमिकाच घेत असल्याचा आरोप होत आहे.
रेल्वेस्टेशन, क्वारंटाईन सेंटर , रेशन दुकान इत्यादी ठिकाणी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग 8-8 तास तर काही शिक्षक 12-12 तास नाईट डय़ुटी करत आहेत. 15 जुलैपासून माध्यमिक शाळांमधून इयत्ता 9वी, 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ही प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या. यानुसार कोविड डय़ुटीसाठी आदेशीत शिक्षकांना त्या कामकाजावरून कार्यमुक्त करावे, असे स्पष्ट आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी व जिल्हाधिकारी यांना शासनाकडून 17 ऑगस्टच्या परिपत्रकाद्वारे देण्यात आले.
याला दोन दिवस उलटूनही अशा डय़ुटीवर शिक्षकांना संबंधित वरिष्ठ अधिकारी वर्गाने कार्यमुक्त केलेले नाही. उलट शासकीय आदेशालाच आव्हान देत नव्याने डय़ुटी देण्यात आली आहे. याबाबत शिक्षकांना न्याय मिळावा, यासाठी माध्यमिक शिक्षक संघटना एकवटल्या आहेत. यामध्ये शिक्षक संघ, शिक्षक भारती, कास्ट्राईब शिक्षक संघटना , शिक्षक परिषद , शिक्षक सेना आदी संघटनांचा समावेश आहे.
बुधवारी 19 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे शिक्षकांची कोविड डय़ुटी रद्द करण्याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी शिक्षक परिषदेचे कोकण विभाग अध्यक्ष रवींद्र इनामदार, संदेश रहाटे, नंदन ढापरे, अर्चना जोशी, पूजा कात्रे यांची उपस्थिती होती.