प्रतिनिधी / खेड
तालुक्यातील भडगाव, भरणे-बाईतवाडी ते बौद्धवाडी येथे शासनाच्या विशेष घटक योजनेच्या मागासवर्गीय निधीचा गैरवापर करणाऱयांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता ठिय्या आंदोलन छेडण्याचा निर्णय येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने घेतला आहे. बुधवारी तशा आशयाचे निवेदन तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांना देण्यात आले आहे.
भडगाव येथे बौद्धवाडी नसतानाही बौद्धवाडीची वस्ती असल्याचे भासवत समाजबांधवांच्या खोटय़ा सहय़ा घेऊन स्वतःच्या फायद्यासाठी 2015-16 विशेष घटक साकव बांधणी कार्यक्रम योजनेंतर्गत 20 लाखाचा निधी खर्चून नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी पूल उभारला आहे. सार्वजनिक बांधकाम चिपळूण व रत्नागिरी तसेच समाजकल्याण विभागास खोटी व बनावट कागदपत्रे देऊन पूल भरणे-बौद्धवाडीसाठी नसताना बौद्धवाडीसाठी असल्याचे भासवत 20 लाख रूपयांचा निधी खर्च केला आहे.
या पुलाचा लाभ स्वतःच्या मालमत्तांकडे जाण्यासाठीच वैभव खेडेकर यांना होणार असून हा पूल बौद्ध समाजासाठी कुठल्याहीप्रकारचा फायदेशीर ठरणार नाही. स्वतःच्या फायद्यासाठी शासनाची दिशाभूल व फसवणूक केल्याप्रकरणी गंभीर स्वरूपाच्या विषयात ज्यांचा संबंध आहे त्यांची सखोल चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करून न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी कोकण संपर्क प्रमुख सुशांत सकपाळ, तालुकाध्यक्ष रजनीकांत जाधव, युवकचे अध्यक्ष विकास धोत्रे, सरचिटणीस सुरेंद्र तांबे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा रेश्मा तांबे, शहराध्यक्ष दीपेश दिपेंद्र जाधव, उपाध्यक्ष बाळकृष्ण देवळेकर, गोपीनाथ जाधव, जिल्हा कोषाध्यक्ष गौतम तांबे, गणेश शिर्के, गौतम तांबे, जितेंद्र तांबे, शंकर तांबे, मिलींद तांबे, आर. पी. येलवे, सखाराम सकपाळ, विजय गमरे आदी उपस्थित होते.