वार्ताहर/ संगमेश्वर
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वरजवळच्या शास्त्री पुलाचे स्ट्रक्चरल ऑडीट पूर्ण करण्यात आले. मात्र ऑडीटदरम्यान तुरळमार्गे कडवई ते अंत्रवली मार्गे हलविण्यात आल्याने प्रवाशांना संगमेश्वरकडे जाण्यासाठी 22 कि.मी. वळसा मारुन जावे लागले. प्रवासादरम्यान अरंद रस्त्यामुळे वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.
ब्रिटीशकालीन शास्त्री पुलाजवळ पुराच्या वेळी धोक्याची पातळी ओलांडली होती. ब्रिटीशकालीन पूल हा सुस्थितीत आहे की नाही, याची चाचपणी करण्यासाठी शनिवारी या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आले. शनिवारी उशिरापर्यंत हे काम सुरु होते. स्ट्रक्चरल दरम्यान महामार्गावरील वाहने तुरळमार्गे वळविण्यात आली होती. कडवई-अंत्रवली मार्ग हा अरुंद असल्याने या मार्गावरुन संगमेश्वरला येण्यासाठी वाहनांना कसरत करावी लागली. त्यातच पावसाची संततधार सुरुच होती. त्यामुळे रुग्ण व वृध्दांचे हाल झाले. तुरळ येथे वाहतूक व्यवस्था संगमेश्वर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार प्रकाश बाईंग, पोलीस नाईक संदीप पाटील, वृषाली सेटकर, उमेश बागवे, उमेश जाधव यांनी पाहिली. त्यांना चिखलीचे पोलीस पाटील रुपेश कदम, तुरळचे संजय ओकटे, कडवईचे रमेश तुळसणकर यांनी मदत केली. शनिवारी उशिरा शास्त्री पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडीटचे काम पूर्ण करण्यात आले.