दिल्ली विधानसभा निवडणुकीवर परिणाम नको : सर्वोच्च न्यायालय
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीतील शाहीनबाग भागात नागरीकत्व सुधारणा कायद्याविरोधात गेले 45 दिवस आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून इतर अनेक निर्माण होत आहेत. त्यामुळे येथून आंदोलकांना हटवावे या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका या भागातील नागरीकांनी सादर केल्या आहेत. या याचिकांवर येत्या सोमवारी सुनावणी करण्यात येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी झालेल्या सुनावणीत स्पष्ट केले आहे.
दिल्लीत शनिवारी विधानसभा निवडणूक होत आहे. शाहीनबाग आंदोलन हा निवडणूक प्रचार काळात मुद्दा बनविण्यात आला होता. तसेच हा राजकीयदृष्टय़ा संवेदनशील विषय आहे. साहजिकच या संबंधी सर्वोच्च न्यायालयाने कोणताही निर्णय दिल्यास त्याचा निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो. असा परिणाम टाळण्यासाठी सुनावणी मतदान पार पडल्यानंतर घेण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले. याचिकाकर्त्यांना तोपर्यंत थांबण्याची सूचना न्यायालयाने केली.
आंदोलनाविरोधात आंदोलन
या आंदोलनामुळे शाहीनबाग परिसराप्रमाणेच ओखला महामार्गावरही वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. हा महामार्ग गर्दीचा असल्याने येथील वाहतूक कोंडी नुकसानकारक आहे. या भागांमधील नागरीकांनाही या आंदोलनाचा त्रास होत आहे. कमालीची अस्वच्छता या भागात निर्माण झाली आहे. आंदोलन दिवसरात्र सतत चालत असल्याने मोठा गोंगाट आणि गोंधळ सतत होत राहतो. चालत येण्याजाणेही कित्येकदा अशक्य होते, अशा तक्रारी परिसरातील नागरीकांनी केल्या आहेत. या आंदोलनाविरोधात स्थानिक नागरीकांनी काही दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. तसेच दिल्ली उच्च न्यायालयातही दाद मागण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण आता अंतिम सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात पोहचले आहे.