प्रतिनिधी/ गोडोली
शाहुनगर परिसरात 15 ते 20 भटक्या कुत्र्यांनी अनेकांना चावा तर छोटय़ा मुलांचा पाठलाग करून चांगलीच दहशत निर्माण केली आहे. त्रिशंकू भाग असल्याने या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी व्यवस्था नसल्याने गेली 4 महिने नागरिक भितीच्या सावटाखाली आहेत.सातारा नगरपालिकेची हद्द वाढ झाली असून नगरपंचायतीने या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी, सामाजिक कार्यकर्ते नितिराज सुर्यवंशी यांनी केली आहे.
त्रिशंकू भाग असल्याने आधीच मुलभूत विकासापासून शाहुनगर वंचित आहे. त्यात स्वच्छता,पथदिवे, सांडपाणी व्यवस्था, सामाजिक समस्या निर्माण झाल्या तरी त्याचा निपटारा करण्याची व्यवस्था नाही. त्यात गेली 4 महिने भटक्या कुत्र्यांच्या टोळ्यांनी शाहुनगर परिसरात चांगलीच दहशत वाढवली आहे. छोटय़ा मुलांच्या मागे हि कुत्री लागतात,तर कोणी हटकण्याचा प्रयत्न केला तर थेट अंगावर धावून जातात.यात अनेकांना चावा घेतल्याने आता या भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली आहे. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी नगरपंचायतीने काही तरी करावे, अशी मागणी होऊ लागली आहे.
हद्द वाढीमुळे शाहुनगर आता सातारा नगरपालिकेचा भाग असून या भटक्या कुत्र्यांचा योग्य बंदोबस्त करा,असे शाहुनगर वासीयांची मागणी जोर धरू लागली आहे.