प्रतिनिधी/शाहुवाडी
तालुक्यात पावसाची संततधार सुरू असून विशेषतः पश्चिम भागात पावसाचा जोर अधिक राहिला आहे. पाटबंधारे विभागाने कडवी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या एकाही बंधाऱ्यांतील बरगे काढण्याची तसदी घेतली नसल्याने अडलेल्या पाण्याच्या प्रचंड दाबामुळे भोसलेवाडी-कडवे बंधारा खचला आहे. स्थानिक ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून बंधाऱ्याचे बरगे काढण्याचा केलेला प्रयत्न असफल ठरला.
कडवे गावाच्या दिशेला खचलेल्या या बंधाऱ्यालगत पाण्याच्या प्रवाहाने मोठी घालणं तयार झाली आहे. पावसाच्या जोरदार सरी कोसळत राहिल्याने बंधारा तुटून मोठे नुकसान होण्याचा धोका संभवत असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पावसाळा सुरू झाला त्यातच गेले दोन दिवस पावसाचा जोर वाढला आहे मात्र संबधीत खात्याने कोणतीच दखल घेतलेली दिसत नाही.