प्रतिनिधी/सातारा
गेल्या चार ते पाच दिवसांपासून शाहूपुरी उपनगरात कृत्रिम पाणी टंचाईने नागरिक हैराण आहेत. अनेकांनी खासगी टँकरने पाणी मागवून भर पावसात होणारी वणवण थांबवली तर कट्टा ग्रुपच्या सदस्यांनी टँकरद्वारे अनेक नागरिकांना मोफत पाणी पुरवठा करत भर पावसात माणुसकीही जपली. मंगळवारी देखील नागरिकांचे पाण्यासाठी हाल सुरुच होते. मात्र, कदाचित बुधवारी सकाळपासून हा पाणी पुरवठा सुरळी होईल, असे प्राधिकरणाकडून सांगण्यात येत आहे.
एकीकडे पावसाने नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल केले असताना गेल्या चार ते पाच दिवसांपासून शाहूपुरीतील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली. प्राधिकरणाच्या माहुली उपसा केंद्राच्या परिसरातील मुख्य पाईप लाईनलाच गळती लागल्याने पाणी पुरवठा ठप्प झाला. प्राधिकरणाने भर पावसात गळती काढण्याचे काम हाती घेतले मात्र निसर्ग, तांत्रिक अडचणीचा सामना करत ते सुरु होते.
त्यासाठी लागणारा एक पार्ट पुण्याहून मागवावा लागला. त्यानंतर सोमवारी तो आल्यावर तो बसवण्यासाठी कामगारांनी मोठी मेहनत घेतली. गळती काढण्याचे काम पूर्णत्वास गेले असून त्यावर जवळपास 130 पेक्षाही जादा सिमेंटच्या पोत्याचे जे कॉंक्रिटीकरण आवश्यक होते ते कामही रात्रीपासून सुरू आहे. मात्र, त्यासाठी केलेले सिमेंट काम पक्के झाल्यानंतरच पाईप लाईन वापरात घ्यावयाची असल्याने आता बुधवारपासून पाणी पुरवठा सुरळीत होईल, असे प्राधिकरणाच्या अधिकाऱयांकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, गेल्या पाच दिवसांपासून पाणी नसल्याने अनेकांनी पाण्याचे टँकर मागवून वेळ मारुन नेली तर कट्टा ग्रुपच्या सदस्यांनी टँकरद्वारे अनेक नागरिकांना मोफत पाणी पुरवठा करुन सामाजिक बांधिलकी जपली. शाहूपुरी ग्रामविकास आघाडीचे नेते भारत भोसले यांनी सातत्याने आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह प्राधिकरणाच्या संपर्कात राहून गळती काढण्याच्या कामाला गती देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आजपासून शाहूपुरीसह, तामजाईनगर, करंजे, मोळाचा ओढा परिसरातील पाणी पुरवठा सुरळीत होईल, अशी आशा निर्माण झाली आहे.