प्रतिनिधी/ सातारा
शाहूपुरी चौक परिसरात माळवाडीकडे जाणारा रस्ता तसेच रांगोळे कॉलनीकडे जाणाऱया रस्त्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून पाणी गळती होत सुरु आहे. यामुळे लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या डांबरी रस्त्यांचे अतोनात नुकसान होत असून हजारो लिटर पाणीही वाया जात असल्याने पाणी गळती तातडीने काढावी, अशी मागणी शाहूपुरी ग्रामविकास आघाडीचे नेते भारत भोसले यांनी केली आहे.
याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात भोसले यांनी म्हटले आहे की, शाहूपुरी चौक परिसरात माळवाडीकडे जाणारा रस्ता तसेच रांगोळे कॉलनीच्या रस्त्यावर गेले अनेक महिन्यांपासून पाणी गळती होत असून यामुळे लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या डांबरी रस्त्यांचे अतोनात नुकसान होत आहे. तसेच नागरिकांना दैनंदिन होणाऱया पाणी पुरवठय़ावर याचा परिणामा होत आहे.
तसेच कोटेश्वर पंपहाऊस येथील 75 एच.पी.चा पंप हा अनेक वेळा नादुरुस्त होत आहे. त्याचाही परिणाम शाहूपुरीतील नागरिकांना दैनंदिन होणाऱया पाणी पुरवठय़ावर होत आहे. नवीन पंपाच्या किंमतीएवढा खर्च सध्याच्या पंप दुरुस्तीवर झाला असल्याचे नाकारता येत नाही. मग नवीन पंप बसविण्यात दिरंगाई का? हा आमच्यासह संपूर्ण शाहूपुरीवासियांना पडलेला प्रश्न आहे. त्यामुळे शाहूपुरी चौक परिसरातील पाणी गळती व कोटेश्वर पंपहाऊस येथील 75 एच.पी.चा नवीन पंप बसविण्याची कार्यवाही नवीन कण्हेर पाणी योजनेचे कारण न सांगता लवकरात लवकर करावी व शाहूपुरीतील नागरिकांना पुरेसा पाणी पुरवठा करावा, अशी मागणी भोसले यांनी केलीय.