सुबराव गवळी तालीम भूमिपूजन व कोनशिला अनावरण समारंभ
प्रतिनिधी/कोल्हापूर
राजर्षी शाहू समाधीस्थळ विकास व रंकाळा सुशोभिकरणासाठी निधी मागणीसंदर्भात राज्य शासनाकडे प्रस्ताव आले आहेत. त्यानुसार राज्य शासनाकडून त्या प्रस्तावाला मान्यता देऊन निधी उपलब्ध केला जाईल, असे सांगून रंकाळा सुशोभिकरणाच्या पहिल्या टफ्फ्यातील कामासाठी तात्काळ निधी मंजूर करणार असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी जाहीर केले.
मंगळवार पेठ येथील सुबराव गवळी तालीमच्या भूमिपूजन, पायाभरणी व कोनशिला अनावरण समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवाडकर होते. प्रमुख उपस्थिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, सातारा माजी जिल्हाप्रमुख संजय मोहिते, सुबराव गवळी तालीमचे अध्यक्ष सुभाष पाटील, उपाध्यक्ष संतोष महाडिक, सेक्रेटरी रमेश मोरे, खजानिस मानसिंग बुरटे, प्रॅक्टिस फुटबॉल क्लब अध्यक्ष नितीन सावंत, अभिषेक देवणे आदी उपस्थित होते. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन समारंभ झाला.
मंत्री शिंदे म्हणाले, कोल्हापूर ही कुस्तीगिरांची भूमी आहे. येथील कुस्तीगिर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कोल्हापूरचे नाव नेत आहेत. त्यामुळे सुबराव गवळी तालीम मंडळाच्या इमारतीसाठी 80 लाखांचा निधी दिल्याबद्दल मनस्वी समाधान आहे. शहरातील अन्य विविध विकासकामांकरीता निधीसाठी राजेश क्षीरसागर व खासदार संजय मंडलिक यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींकडून यांच्याकडून पाठपुरावा सुरु आहे. रंकाळा सुशोभिकरणासंदर्भात महापालिका आयुक्तांशी आपली चर्चा झाली आहे. ते मोठे पर्यटनस्थळ होऊ शकते, त्यानुसार शासनाकडे प्रस्ताव आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर रंकाळा सुशोभिकरणाच्या पहिल्या टफ्फ्यासाठी लागणारा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
राजेश क्षीरसागर यांनी शहराची हद्दवाढ ही नैसर्गिक असून ती झाल्याशिवाय शहराचा विकास होणार नाही, असे सांगून रंकाळा सुशोभिकरणासह शाहू समाधीस्थळ विकासासाठी निधी द्यावा, अशी मागणी केली.
विजय देवणे यांनी प्रॅक्टिस फुटबॉल क्लबला इमारत बांधकामासाठी महापालिकेने भाडेतत्वावर जागा द्यावी, तसेच यासाठी 2 कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी केली.
धमक्यांना घाबरत नाही : मंत्री शिंदे
गडचिरोलीचे पालकमंत्रीपद घेतल्यानंतर अशा धमक्या येत असतात. अशा धमक्यांना मी घाबरत नाही. शेवटी गडचिरोलीचा विकास हाच नक्षलवाद संपविणार आहे. त्यामुळे या जिह्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. तेथील तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देणे, रस्ते, पूल बांधणीचे काम हे सरकारच्या माध्यमातून केले जाणार आहे, असे मंत्री शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.