प्रतिनिधी / कोल्हापूर
लोकाराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना स्वर्गवास होवून 2022 साली शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. या शताब्दी स्मृती वर्षापर्यंत राजर्षी शाहू समाधी स्मारकाचे काम शंभर टक्के पूर्ण करण्याचे महापालिकेचे उद्दीष्ट आहे. पहिल्या टप्प्यातील पाऊणे तीन कोटींचे काम स्वनिधीतून पूर्ण केले आहे. उर्वरीत कामासाठी सव्वा पाच कोटीं रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. तरी समाधी स्मारकाचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी नेतेमंडळींनी भरीव तरतुद करावी, असे आवाहन महापौर ऍड. सुरमंजिरी लाटकर यांनी केले.
राजर्षी शाहू समाधी स्मारक स्थळाच्या लोकार्पण सोहळय़ानिमित्त दसरा चौक येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचे स्वागत करताना महापौर ऍड. लाटकर बोलत होत्या.
महापौर लाटकर म्हणाल्या, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी बहुजनांसाठी शिक्षणाचीद्वारे खुली केली. शाहू भक्त गंगाराम कांबळे यांना हॉटेल व्यवसाय सुरु करुन देवून व तिथे स्वतः चहा पिण्यासाठी जावून समाजातील विषमता, अस्पृक्षता कमी केली. स्त्रीशिक्षणाला प्रोत्साहन दिले. बहुजनांच्या उद्धारासाठी अखेरच्या श्वासापर्यंत आपले जीवन व्यथीत करणाऱया राजर्षी शाहू महाराजांचे नर्सरी बागेत समाधी स्मारक उभारण्याचा निर्णय महापालिकेतील सर्व पदाधिकारी नगरसेवक यांनी घेतला.
त्यानुसार प्रत्येक नगरसेवकाने स्वनिधीतील ठरावीक रक्कम स्मारकाच्या कामासाठी दिले. पाऊणे तीन कोटी रुपये खर्च करुन पहिल्या टप्प्यातील काम महापालिकेने पूर्ण केले. उर्वरीत कामासाठी सुमारे सव्वापाच कोटी रुपयांची गरज आहे. 2022 साल हे राजर्षी शाहू महाराजांचे स्मृती शताब्दीवर्ष आहे. त्यामुळे यापुर्वी स्मारकाचे पुढील टप्प्यातील काम पूर्ण होणे गरजेचे आहे. यासाठी नेतेमंडळी भरीव तरतुद करतील अशी अपेक्षा महापौर ऍड. लाटकर यांनी व्यक्त केली.