वार्ताहर / हणमंतवाडी
करवीर तालुक्यातील चिखली गावाहून शिंगणापूरच्या दिशेने जाणाऱ्या रिक्षा चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने शिंगणापूर बंधाऱ्यामध्ये रिक्षा पलटी झाली. या अपघातामध्ये चालक रणजीत विरूपाक्ष स्वामी (वय ५० ,रा. लक्षतीर्थ वसाहत, शिवनेरी गल्ली) याना जलसमाधी मिळाली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या पथकाने तातडीने शिंगणापूर बंधाऱ्यामध्ये शोध मोहिम राबविली. यामध्ये रिक्षाचालकाचा मृतदेह शोधण्यात या पथकाला यश आले आहे.
याबाबत घटनास्थळावरून समजलेली हकीकत अशी, लक्षतीर्थ वसाहत परिसरामध्ये राहणाऱ्या रणजीत विरुपाक्ष स्वामी हे रिक्षा व्यवसाय करतात. शनिवारी पहाटे ते खांडसरीवरून शिंगणापुरच्या दिशेने जात होते. दरम्यान म्हसोबा मंदिर परिसरातील गणेशनगर येथील एका चारचाकी वाहनाला त्यांच्या रिक्षाची धडक बसली. यामध्ये चारचाकीचे नुकसान झाले. चारचाकी वाहनाच्या मालकाने काही सहकाऱ्यांसह त्यांचा पाठलाग केला.
दरम्यान स्वामी यानी रिक्षा वेगाने शिंगणापुर बंधाऱ्याकडे नेली. बंधारा ओलांडून त्यांनी वेगाने चिखली गाठली. तेथे गेल्यावर गावत प्रवेश बंद असल्यामुळे रिक्षा चालक स्वामी याना पुन्हा माघारी यावे लागले.चिखलीहुन शिंगणापूरच्या दिशेने ते वेगाने येत होते. शिंगणापूर बंधाऱ्याच्या मधोमध ते आले असता रिक्षावरील नियंत्रण हरवल्याने रिक्षासह स्वामी हे थेट बंधाऱ्यात कोसळले. तोवर पाठलाग करणाऱ्या व्यक्ती बंधाऱ्यावर पोहचल्या होत्या. त्यांनी रिक्षा व्यावसायिक स्वामी यांनी बंधाऱ्यातून वेगाने वाहणाऱ्या पाण्यात पोहताना पाहिले. मात्र त्यानंतर ते नजरेस आले नाहीत
याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी प्रसाद संकपाळ यांना माहिती देण्यात आली. त्यांनी रिक्षा व चालकाच्या शोधासाठी तात्काळ शिंगणापूरकडे पथक रवाना केले. पथक प्रमुख सुनील कांबळे, कृष्णात सोरटे, तेजस देसाई, शामल कांबळे, सानिका शिंदे, वैष्णवी कांबळे, बर्षा सोरटे, कोमल कांबळे यांच्यासह ३० जणांच्या पथकाने सकाळी ९ वाजता शोध मोहिम सुरू केली. ११ वाजून ५२ मिनिटांनी स्वामी यांचा मृतदेह पंचगंगा नदी पात्रात बंधाऱ्यापासून अर्ध्या किलोमिटर अंतरावर सापडला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआरमध्ये पाठविण्यात आला. सायंकाळपर्यंत रिक्षाचा शोध सुरू होता. पण रिक्षा सापडली नाही.