वार्ताहर/ शिखरशिंगणापूर
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिखरशिंगणापूर येथील शंभू महादेवाची वार्षिक चैत्रयात्रा 2 ते 16 एप्रिल याकालावधीत होत असून भाविकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करून शिंगणापूर यात्रा आनंदाने पार पाडण्याचे आवाहन माणचे प्रांताधिकारी शैलेश सुर्यवंशी यांनी केले. त्याच बरोबर स्वयंशिस्त पळून प्रशासनास सहकार्य करावे.कोरोना आपत्तीमुळे दोन वर्षे खंड पडलेल्या शिंगणापूर यात्रेस प्रशासनाने यावर्षी हिरवा कंदील दिल्याने स्थानिक ग्रामस्थ, व्यावसायिकांसह भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
शिंगणापूर येथील शंभू महादेव यात्रेच्या अनुषंगाने माणचे प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली शिंगणापूरमध्ये नियोजन बैठक पार पडली. यावेळी माणचे तहसीलदार रिचर्ड यानथन, गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, तालुका वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण कोडलकर, शिंगणापूर सरपंच रेश्मा शिंगाडे, उपसरपंच शशिकांत भोसले, माजी सरपंच राजाराम बोराटे, देवस्थानचे व्यवस्थापक ओंकार देशपांडे, कावडीप्रमुख भाविक, माण, फलटण व माळशिरस विभागातील विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील मोठय़ा यात्रांमध्ये शिंगणापूर यात्रेचा समावेश होतो. दरवर्षी गुढीपाडवा ते पौर्णिमा या कालावधीत भरणाया शिंगणापूर यात्रेसाठी मराठवाडा, विदर्भ, खानदेश, आंध्र, कर्नाटक मधून 7 ते 8 लाख भाविक येत असतात.
कोरोनाचे संकटामुळे प्रशासनाने सलग दोन वर्षे शिंगणापूर येथील वार्षिक यात्रा रद्द केली होती. त्यामुळे यात्रेसाठी येणाया लाखो भाविकांच्या उत्साहावर विरजण पडले होते. सध्या कोरोनाची तीव्रता कमी झाल्याने प्रशासनाने बहुतांश निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे शिंगणापूर यात्रेच्या निर्णयाबाबत प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते.
मंगळवारी यात्रेबाबत झालेल्या नियोजन बैठकीत माणचे प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी शिंगणापूर यात्रेसाठी प्रशासन परवानगी देत असल्याचे स्पष्ट केले. लसीकरण मोहिमेमुळे कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यात यश आले असून भाविकांनी कोरोनाबाबत असलेल्या शासनाच्या नियमांचे पालन करून शिंगणापूर यात्रा उत्साहात पार पाडण्याचे आवाहन प्रांताधिकायांनी यावेळी केले. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाले असले तरीही आपत्ती व्यवस्थापन विभाग, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत यात्रा कमिटी तसेच देवस्थान समितीने भाविकांच्या आरोग्याबाबत विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना प्रांताधिकारी यांनी संबंधित यंत्रणेस दिल्या. भाविकांच्या भावनांचा आदर करून प्रशासनाने यात्रेस परवानगी दिली असून येणाया भाविकांनी आरोग्यविषयक खबरदारी घेऊन यात्रेचा आनंद घेण्याचे आवाहन प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी केले. तसेच भाविकांना सोयीसुविधा देण्यासाठी सर्व विभागांनी सतर्क राहण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
शिंगणापूर यात्रेच्या बंदोबस्तासाठी पोलीस अधिकारी तसेच 200 पोलीस कर्मचारी व 250 होमगार्ड तैनात करण्यात येणार असल्याचे दहिवडीचे सपोनि संतोष तासगावकर यांनी सांगितले. भाविकांनी मंदिर परिसरात दर्शन घेताना शिस्त पाळावी, मुंगीघाट परिसरात विशेष बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून कावडधारक भाविकांनी स्वयंशिस्तीचे पालन करून दिलेल्या वेळेनुसार दर्शन घ्यावे, कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून भाविकांनी यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन सपोनि तासगावकर यांनी केले.
आरोग्य विभागाच्या वतीने यात्रा परिसरात चार आरोग्यपथके तैनात करण्यात येणार असून 66 आरोग्य कर्मचारी , 2 रुग्णवाहिका नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण कोडलकर यांनी दिली. यात्रेसाठी येणाया व्यावसायिकांचे लसीकरण झाले असल्याबाबतची तपासणी आरोग्य विभागामार्फत करण्यात येणार असल्याचे कोडलकर यांनी सांगितले.
यात्रेसाठी ग्रामपंचायतीमार्फत भाविकांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा पुरविण्यात येणार असल्याचे राजाराम बोराटे यांनी सांगितले. भाविकांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाने आवश्यक टँकर उपलब्ध करून घ्यावेत, आरोग्य विभागाने औषधपुरवठा करावा, फिरत्या शौचालयांची सोय करावी, वीजवितरण विभागाने यात्रापरिसरातील दुरुस्तीची कामे त्वरित करावीत, बांधकाम विभागाने आवश्यक ठिकाणची काटेरी झुडपे काढावीत, एसटीने भाविकांसाठी जादा बसेसची सोय करावी अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने बैठकीत करण्यात आली. शिंगणापूर यात्रेस परवानगी दिल्याबद्दल वीरभद्र कावडे यांनी प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांना धन्यवाद दिले.